परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली. या भूतलावर त्याने अनेक गोष्टी निर्माण केल्या त्यात वनस्पती, पशु, प्राणी या बरोबर एक अतिशय वेगळा आणि बुद्धिवान माणूस नावाचा प्राणी त्याने निर्माण केला. त्याच्या निर्मितीच्या वेळेस बारीक-सारीक तपशील पूर्ण करताना देवाला खूपच त्रास झाला. मानवाच्या निर्मितीनंतर त्याचा हा त्रास फारच वाढू लागला. कारण प्रत्येक मानव संकटाच्या वेळेस किवा इच्छापूर्तीसाठी त्या ईश्वराला सतत हाका मारू लागला. ‘‘चोवीस तास मानव आपल्या तक्रारीच मांडतो आहे. त्यामुळे मला अजिबात स्वस्थता नाही. मी काय करू ? कोठे लपू ? माणसापासून दूर अशी एखादी जागा मला सुचवा. जेणे करून मला विश्रांती मिळेल !’’ असे तो इतर देवतांना विचारू लागला. अनेकांनी अनेक पर्याय सुचविले पण तेथे माणूस पोहोचणारच होता. त्यामुळे कोणतीच जागा निश्चित होत नव्हती. शेवटी बृहस्पती देव उठले त्यांनी ईश्वराला सांगितले, ‘‘ तू माणसाच्याच आत लपून बैस !’’ ईश्वराला ती कल्पना आवडली आणि त्यांनी तसे केले. त्या दिवसापासून ईश्वर सुखी झाले.
तात्पर्य – ईश्वराला आपण सतत बाहेर शोधत असतो पण ईश्वर आपल्या आतच आहे.
Leave a Reply