नाडकर्णी, रमेशचंद्र गंगाराम

 

जन्म ४ एप्रिल १९३३
रमेशचंद्र गंगाराम उर्फ बापू नाडकर्णी यांचा जन्म ४ एप्रिल १९३३ रोजी नाशिक येथे झाला. त्यांनी कसोटी सामन्यात पदार्पण १६ ते २१ डिसेंबर १९५५ रोजी न्यू झीलंड विरुद्ध दिल्ली येथील सामन्यात केले. शेवटचा कसोटी सामना देखील ते न्यूझीलंड विरुद्ध ७ ते १२ मार्च १९६८ ला ऑकलंड येथे खेळले. बापू नाडकर्णी हरहुन्नरी खेळडू असूनही क्रिकेटच्या इतिहासात अजरामर झाले ते त्यांच्या गोलंदाजीच्या पराक्रमामुळे. त्यांच्या गोलंदाजीच्या अनेक कथा आणि किस्से प्रसिद्ध आहेत. बापू आपल्या गोलंदाजीत एकही वेळा चूक करीत नाहीत हिच सगळ्यात मोठी चूक ते करतात असे क्रिकेटचे पंडित म्हणत. प्रथम श्रेणी आणि कसोटी सामन्यातील त्यांची गोलंदाजीची आकडेवारी पाहिल्यावर अनेकांनी त्यांना सगळ्यात कमी धावा देणारे गोलंदाज म्हणून मानले आहे. खेळपट्टीवर एक नाणे ठेवून ओळीने ५० वेळा उडविणारे म्हणूनही बापू प्रसिद्ध आहेत. सन १९६०-६१ मध्ये पाकिस्तान विरूद्ध कानपूर येथील सामन्यात त्यांच्या गोलंदाजीचे पृथक्करण ३२ षटकात २४ निर्धाव २३ धावा ० बळी असे होते तर पुढील दिल्लीच्या सामन्याचे चित्र ३४-२४-२४-१ असे होते. इंग्लंड विरुद्ध १९६४ साली मद्रास येथे झालेल्या सामन्यातील त्यांची गोलंदाजीची आकडेवारी ३२-२७-५-० अशी होती. यातही बापूंनी २१ षटके सलगपणे निर्धाव टाकली आहेत आणि हा पराक्रम आजही त्यांच्याच नावावर आहे. त्यांनी कसोटी सामन्यात केवळ १.६७ धावा / षटक दिल्या तर प्रथम श्रेणीत १.६४ धावा / षटक आपल्या गोलंदाजीत मोजल्या.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*