पाटील, कावेरीताई

१९४२ सालच्या ऊठावावेळी जेव्हा सबंध भारत स्वातंत्राच्या चैतन्यमयी लाटांवर स्वार होण्याकरिता संघटीत झाला होता, त्यावेळी स्त्रियांचं योगदान बहुमूल्य होतं; अश्या आवर्जुन घेतल्या जाणार्‍या नावांपैकी एक नाव म्हणजे कावेरीताई पाटील. मोर्चे व सत्याग्रहांमधील सहभागामुळे कावेरीताईंना दोन वर्षे कारावासाची शिक्षा झालेली होती. त्यात त्या गरोदरही होत्या. पण आपल्या गरोदरपणाची पर्वा न करता तहसीलदार कचेरीवर आपल्या भगिनींसमवेत तिरंगा फडकविण्याकरिता जाण्याचे असामान्य धाडसी पाऊल त्यांनी उचलले होते. त्यावेळी त्यांना बारा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. ह्या शिक्षेदरम्यान येरवडा तुरूंगात त्यांनी मुलाला जन्म दिला. पुढचे पाच महिने आपल्या तान्ह्या बाळासोबत त्या कारागृहातच होत्या. कारागृहात जन्मलेल्या ह्या बाळाचे, सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी बारसे करून भारत नाव ठेवले. स्त्रिशक्ती आपल्या ध्येयाला पुर्णत्वास नेणासाठी कुठल्याही अग्निदिव्यांमधून तरून जाऊ शकते, या विधानाचे प्रतिबिंब त्यांच्या जिद्दी व बंडखोरी उदाहरणामधून स्पष्ट दिसते.

एक अत्यंत तळपत्या व तडफदार स्वातंत्र्य सेनानी म्हणून जेवढया कावेरीताई प्रसिध्द होत्या, तेवढयाच दिमाखाने त्यांचे नाव समाजकार्य, आदिवासी शिक्षण, व कामगार संघटना अश्यया अनेक क्षेत्रांच्या क्षितीजांवर झळकले.कळवा गावातील पाणी आणि विजेची समस्या सोडविण्यासाठी कावेरीताईंनी कळवा हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयाची स्थापना केली. बदलापूरजवळील पिंपरोळी ह्या आदिवासी भागात माध्यमिक शाळा काढली. समर्थ वस्तिगृह बांधून तिथे ४० आदिवासी विद्यार्थिनींच्या राहण्याची सोय केली. कळवा येथील मुकंद आर्यन कंपनीच्या व्यवस्थापनाने दता सामंत कामगार संघटनेबरोबरचा तंटा विकोपास गेल्याने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कावेरीताईंनी मुकंद एम्प्लाईज युनियनची स्थापना करून कुशलतेने यशस्वी समेट घडवून आणला होता. पुढे ह्या युनियनचे तब्बल बारा वर्षे नेतृत्व कावेरीताई पाटीलांनी केले होते .

दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*