नवीन लेखन...

शब्दांची पालखी – भाग एक

मी शब्दांच्या प्रेमात पडलो त्याची कथा.. (भाग एक)

मला अगदी मी वाचायला शिकलो, त्या वेळेपासूनच वाचायची आवड लागली होती. तेंव्हा परिस्थिती यथातथाच. आमचीच नव्हे, तर बहुतेक सर्वच कुटूंब गरीब म्हणता येतील अशीच. वाचायची आवड शाळेच्या पुस्तकांवर भागवायची कारण इतर पुस्तकं मिळणं अशक्यच होतं. संस्कृतीत सण ही एकच गोष्ट असायची, वाचन वैगेरेही संस्कृतीचा भाग आहे, हे कुणाच्या गांवीही नसायचं. पुस्तकं सोडा, रोजचा पेपर मिळणंही दुरापास्त असायचं. पेपर न घेणं यासाठी, परवडत नाही हे एकच कारण असायचं.

मी लहानपणी एका बैठ्या चाळीत राहायचो. चाळीत दिडशे चोरस फुटाच्या सोळा खोल्या. आठ पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला आठ. तशीच मागेपुढे आठ आठ खोल्या असलेली आमच्या समोर एक चाळ. दोन चाळींच्यामधे पाच फुट रुदीची आणि चाळीच्या लांबीएवढी गल्ली. खोल्या जरी असल्या, तरी बहुतेक सर्वांचा वावर गल्लीतच. बहुतेक सर्व मालवणी, दोन-तीन गुजराती, परंतू वेश सोडला तर भाषेसहीत अंतर्बाह्य मराठीच. एक कमावणारा आणि कमीतकमी ६ खाणारे अशी सर्वांचीच परिस्थिती. महिना अखेरीस पेपर ‘विक’ असायचा. अशा आम्हा गरीब घरच्यांना रोजचा पेपर घेणं परवडायचं नाही. खरं सांगायचं तर, पेपर घेणं ही चैन असायची. मला वाचनाचा नाद कसा लागला, हे समजण्यासाठी माझी राहाण्याची पार्श्वभुमी काय होती, हे कळावं यासाठी थोडं पाल्हाळ लावलं.

पूर्वी बहुतेक चाळीत पेपर घेणारं एखादंच कुटूंब असे. एका घरात येणारा पेपर सबंध चाळ वाचायची. एकदा पेपर घरातून गेला, की मग त्या पेपरच्या रद्दीशीही मूळ मालकांचा संबंध येत नसे.

आमच्या चाळीतही लब्दे नांवाच्या एका कुटुंबाकडे दररोजचा ‘लोकसत्ता’ यायचा. आमच्या दोन चाळींत पेपर घेणारी आणखीही एक-दोन घरं असावीत, परंतू लब्देंशी जरा जास्तीचा घरोबा असल्याने, त्यांचा पेपर माझ्या हक्काचा होता. मला तर ते श्रीमंतच वाटायचे. गंम्मत म्हणजे त्या कुटुंबातल्या कुणालाही पेपर -पुस्तकं वाचायची आवड नव्हती. सकाळ झाली, की सर्वात प्रथम लब्द्यांकडे धावायचो. ताज्या पेपरचा वास घेत त्याची घडी मोडताना मी काहीतरी खजिन्याची पेटी उघडतोय असं वाटायचं. अर्थात खजिन्याची पेटी वैगेरे शब्द आजचे, तेंव्हा हे शब्द माहित असले, तरी त्यांच्या अर्थाची व्याप्ती माहित नव्हती. पेपरचा छाती भरून वास घेऊन मगच त्याची घडी मोडायची ही माझी तेंव्हाची सवय ५२ व्या वर्षातही कायम आहे. आजही मला कोणत्याही पेपरच्या पानांचा टोकं बरोबर जुळलेली आणि मधली मुख्य घडी मध्यावर असल्याशिवाय पेपर वाचायला होत नाही..!!

मला शब्दांशी खेळायच्या नादाला लावलं, ते लोकसत्ताच्या त्यावेळच्या हेडींगने..! ‘लोकसत्ता’चं सोमवार ते शनिवारचं हेडींग काळ्या शाईत आणि फक्त रविवारचं हेडींग लाल शाईत असायचं. आताही तसंच असतं. पण पूर्वी रविवारच्या लोकसत्ताच्या हेडींगच्या डोक्यावर ‘रविवारची’ असा शब्द लिहिलेला असायचा. आता फक्त ‘रविवार’ असं लिहीतात. तेंव्हा वाचताना ‘रविवारची लोकसत्ता’ असं वाचायला लागायचं. ‘तो पेपर’ किंवा ‘तो लोकसत्ता’असं आम्ही नेहेमी म्हणत असल्यानं, पेपर हा शब्द पुल्लिंगी आहे हे मनात बसलं होतं. असं असताना, ‘रविवारचा लोकसत्ता’ असं न लिहीता, पेपरवाले ‘रविवारची लोकसत्ता’ असं चुकीचं का लिहीतात, असा प्रश्न मला तेंव्हा नेहेमी पडत असे. बरं कुणाला विचारायची सोयही नसे, ‘कसल्यो मेलो शंका काढता हा, शाळेत बाईंका इचार’ असं अस्सल मालवणीत ऐकायला लागायचं. त्या मुळे स्वत:च त्यावर त्या वयाच्या मानाने विचार करणं भाग असायचं. पुढे कधीतरी कळत्या वयात गेल्यावर हा समजलं, की ‘रविवारची लोकसत्ता’ म्हणजे ‘लोकांची सत्ता, ती लोकसत्ता’..! ‘ती सत्ता’ या अर्थाने छापलेलं असायचं ते. अर्थात हे त्या लहान वयात कळलं नाही ते एका अर्थानं बरंच झालं, नाहीतर तेंव्हाच्या कोवळ्या मनावर, ती खरोखरंच लोकांची सत्ता आहे असं कोरलं गेलं असतं, तर आताची विपरीत परिस्थिती पाहून मला आता निश्चितच निराशेचा झटका आला असता..पण तेंव्हा ती खरंच लोकांची सत्ता असावी. ‘लोकसत्ता’ या जाडजूड हेडींगखाली दबून गेल्यासारखी दिसणारी ‘लोकमान्य लोकशक्ती’ झाली ती अलीकडे..!

त्या वयात फरसं काही कळत नसलं तरी जे वाचायचो, ते काहीतरी जादुभरं आहे हे मात्र जाणवायचं. अनेक शब्द, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेत्यांची नांव, देशांची नांव, घडलेल्या घटना तेंव्हाच्या कुतुहलाच्या नजरेनं वाचल्या होत्या, त्यांचा संबंध पुढे जाणतेपणी लागायला लागला. तेंव्हाचं तंतोतंत आठवत नसलं, तरी पार्श्वभुमी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात असायची, तेंव्हा वाचलेलं संदर्भ म्हणून चटकन पुढे यायचं, अजुनही येतं. लिहावं कसं याचंही तेंव्हा नकळतचं शिक्षण झालं असावं, असं मला आता वाटतं..

‘लोकसत्ता’ हा एकमेंव पेपर तेंव्हा मला वाचायला मिळायचा. तो खुप वाचला, कळायचं फार नाही, पण वाचन म्हणजे काहीतरी भारी आहे असं मात्र वाटायचं. अगदी हरवून जायला व्हायचं. शब्दांची जादू चढायची. मला वाचनाचा नाद ‘लोकसत्ता’ने खुप लहान वयातच लावला आणि त्यामुळे मी मैदानी आणि बैठ्याही खेळात कधी रमलो नाही. वाचनाचा नाद पुढे पुढे कसा वाढत गेला, ते पुढच्या भागात..!!

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..