नवीन लेखन...

मुंबईला ‘तिची जमीन’ देणारा एक रस्ता आणि ‘ब्रीच कँडी’ची जन्मकथा

The Story of an Old Road in Mumbai and Breach Candy

प्राचीन काळापासून मानव शहर वसवत आलाय..बरीशी जागा, आजूबाजूला पाण्याची सोय बघायची आणि वसती करायची हा पुरातन परिपाठ आहे..प्राचीन हरप्पा किंवा मोहोन्जादारो शहर असतील किंवा अगदी आता-आता पर्यंत वसलेली शहर असोत, अगदी याच पद्धतीने त्यांची निर्मिती झाली आहे..या सर्व शहरात आणि मुंबई शहरात एक जमीन अस्मानाचा फरक आहे आणि तो म्हणजे मुंबईला वसण्यासाठी तिची, स्वतःची अशी जमीनच नव्हती..पाच लहान-मोठी बेटं, त्यात भरतीचं पाणी शिरलं की ती सात दिसायची, अश्या मुंबई नामक बेटा-बेटांच्या ओसाड टापूचं एक जागतिक दर्जाच महानगर बनतं हे आश्चर्याच आहे..आणि हे आश्चर्य घडवून आणलं ते सायबाच्या पोरानं..!

इंग्रजांच्या ताब्यात मुंबई यायच्या अगोदरही मुंबईवर अनेक राजे-सुलतान व पोर्तुगीजांसारख्या युरोपियनांचे राज्य होतं परंतु या कोणाच्याही मनात मुंबईची बेटं जोडून एकसंघ शहर करावे असे आले नाही..कदाचित आलेही असेल परंतु त्याकाळची राजकीय अस्थिरता आणि द्रव्याची कमतरता या मुळे ते शक्यही झालं नसेल..चलाख इंग्रजांच्या मनात मात्र हे शहर त्यांच्या ताब्यात आले तेंव्हापासून ही योजना असावी..आणि त्यामुळेच त्यांनी पोर्तुगीज राजकन्येशी आपल्या राजाच्या लग्नाचा घाट घालून तो यशस्वीपणे घडवून आणला असण्याची शक्यता जास्त वाटते..

इस्ट इंडिया कंपनीने १६७१-७२ साली गव्हर्नर जेराल्ड ऑन्जीयर याला मुंबईचा गव्हर्नर म्हणून नियुक्त केले. मुंबईच महत्व ओळखलेला हा एक द्रष्टा इंग्रज. अनेक इतिहासकार मुंबईचा जनक (फादर ऑफ बॉम्बे ) म्हणतात. तेंव्हाच्या मुंबईच्या विकासाला पहिली चालना दिली ती या इंग्रजाने ऑन्जीयरच्या मनात मुंबईची विखुरलेली बेट भरणी घालून एकसंघ करण्याची योजना इथे आल्यापासून घोळत होती. तशी मंजुरीही त्याने त्यांच्या हेड ऑफिसकडे म्हणजे इंग्लंडकडे मागितली होती परंतु इस्ट इंडिया कंपनी नफ्या-तोट्याचा विचार करणारी व्यापारी कंपनी असल्याने एवढा खर्च करणे शक्य नसल्याचे त्यांनी उत्तर दिलं. तरी ऑन्जीयर व त्यांच्या नंतर आलेल्या अनेक ब्रिटीश गव्हर्नरानी आपले प्रयत्न चालू ठेवले..

या नंतर बरोब्बर शंभर वर्षांनी सन १७७१ मध्ये विलियम हॉर्नबी ह्याची मुंबईच्या गव्हर्नरपदी नियुक्ती झाली. एव्हाना शहर बऱ्यापैकी वाढले होते..लोक बाहेरून इथे स्थायिक होण्यासाठी येत होते आणि साहजिकच त्यांच्या निवासासा-व्यापारास जागा अपुरी पडू लागली होती..आता मात्र बेटांमध्ये भरणी केल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली..

पुढे जाण्यापूर्वी मुंबईच्या बेटामधल्या त्या काळच्या परिस्थितीची थोडी कल्पना घेऊ. कुलाबा, छोटा कुलाबा, मुंबई, वरळी, माहीम, परळ व माझगाव अशी मुंबईची सात बेटं. त्यात मुंबई हे आकाराने सर्वात मोठ आणि इंग्रजांचं मुख्य ठाण. साहजिकच तेंव्हाची वस्ती व व्यापारी पेढ्या या बेटावर दाटीवाटीने वसल्या होत्या. मुंबई बेटा खालोखालची वसती मुंबईच्या शेजारी एका चिंचोळ्या खाडी पलीकडच्या माझगाव बेटावर होती इतर बेटांवर तुरळक वस्ती होती. मुंबई आणि त्याच्या पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात जवळचे बेट वरळी यात जवळपास एका मैलाचं अंतर होत जे भरतीच्या काळात पाण्याने भरून जायचं. मुंबईच्या सात बेटांपैकी या ठिकाणाहून सर्वात जास्त पाणी आत शिरायचं. इथे कोणत्याही काळी जायचे तर बोटीला पर्याय नव्हता..(तुम्हाला अंदाज येण्यासाठी सोबत मुंबई व बेटांचा ढोबळ नकाशा पाठवत आहे)

या दोन बेटातून भरतीच्या वेळेस पाणी आत घुसायच ते थेट पूर्वेच्या माझगावला जाऊन भिडायचं. या दोघांच्या मधला भायखळा, भेंडीबाजार, पायधुनी वैगेरे विभाग सखल असल्याने हा भाग संपूर्णपणे पाण्याने भरून जायचा..परिणामी पलीकडच्या माझगाव आदि परिसराशी संपर्कासाठी लहान होदिशिवाय पर्याय नसायचा. त्यात भारती ओसरली की ती जागा कायम ओलसर, चिखलाची आणि दलदलीची राहायची..अश्या जमिनीत डास-चिलटांची भरमसाट पैदास होऊन सर्वत्र रोगराई थैमान घालायची..असे म्हणतात की त्यावेळेस मुंबई बेटावर नोकरी साठी आलेल्या कैक युरोपियनांचे आजारपणामुळे मरण ओढवले होते..

विलियम हॉर्नबीने आता उचल खाल्ली आणि मुंबई बेटावरील सध्याच्या ‘महालक्ष्मी’ ते वरळी बेटामध्ये समुद्राचे आत येणारे पाणी अडविण्यासाठी सध्याच्या ‘अत्रिया’ मॉल पर्यंत एक बांध घालून त्यावरून त्यावर वरळी व त्यापलीकडील बेटांशी संपर्क साधण्यासाठी कायम स्वरूपी सडक बांधण्याचा विचार करून त्यास परवानगी व फंड्स उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आपल्या लंडनच्या मुख्य कचेरीस पाठवला. त्याच्या गाठीशी पूर्वीच्या गव्हर्नरानी केलेला याच बाबतीत केलेल्या पत्रव्यवहाराच्या व त्यावर कम्पनीने लावलेल्या नकारघंटाचा अनुभव असल्याने, या पठ्याने कंपनीच्या परवानगीची वाट न पाहता सन १७८१-८२ मध्ये कामाला सुरुवातही केली.. हॉर्नबी याने कामाला सुरुवात तर केली परंतु पैश्याचा प्रश्न उभा राहिला..असे म्हणतात की हॉर्नबी ह्याने त्याकाळी माझगावात कोणो ‘मिस रोज नेसबीट’ नांवाची एका श्रीमंत बाई राहत होती तिला गाठलं व तिच्याकडून पैसा उभा केला..ह्यावेळेस त्याची गवर्नर पदाची मुदत संपायला केवळ दोन-अडीच वर्षे शिल्लक होती..(विलियम हॉर्नबी याच्या सस्पेन्शनच्या घटनेला मी वाचलेल्या पुस्तकांत आधार नाही असे म्हटलेले आहे. तरी त्याकाळची परिस्थिती पाहता ते नाकारता येण्यासारखे नाही..)

एव्हाना हॉर्नबीने विना मंजुरी वरळीचे खिंडार बुजवायच्या कामाला सुरुवात केल्याची बातमी इस्ट इंडिया कंपनीच्या लंडन स्थित कार्यालयात जाऊन थडकली होती..झाले, लगेच फर्मान सुटले आणि हॉर्नबीला गव्हर्नर पदावरून त्वरित सस्पेंड केल्याचा लखोटा दोन महिन्यात मुंबईत येऊन थडकला.तेंव्हा सर्व पत्रव्यवहार बोटीनेच येत असल्यामुळे दोन-तीन महिन्यांचा कालावधी सहज लागायचा..हॉर्नबीच्या हाती लखोटा पडला आणि त्याच्या अपेक्षेप्रमाणेच त्यात त्याच्या सस्पेन्शनची ऑर्डर होती. आता थोडेसेच काम शिल्लक राहिले होते आणि नवीन गव्हर्नर चार्ज घेण्यासाठी येण्यास आणखी दोन-तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक होता. हॉर्नबीने जराही न डगमगता सस्पेन्शनची ऑर्डर दाबून ठेवली व काम पुढे सुरु ठेवले आणि शेवटी सन १७८४ मध्ये हा बांध आणि त्यावरील रस्ता बांधून पूर्ण केला आणि मगच आपल्या पदाचा चार्ज नवीन गव्हर्नरकडे दिला सोडला..

पेडर रोड उतरून आपण खाली आलो की वरळीकडे येताना आपल्याला एका प्रशस्त अर्धचंद्राकृती रस्त्यावरून यावं लागतं. डाव्या बाजूला समुद्रात हाजी अली तर उजव्या बाजूला लाला लजपतराय कॉलेज, रेसकोर्स, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदी ठिकाण लागतात व पुढे आपण ‘अत्रीया’ मॉल मागे टाकून महापालिकेच्या ‘लव्ह ग्रोव्ह’ उदंचन केंद्रापर्यंत पोहोचतो.. हिरा-पन्ना शॉपिंग सेंटर ते वरळीच्या ‘लव्ह ग्रोव्ह’ पर्यंतचा हा सुरेख देखणा रस्ता म्हणजेच विलियम हॉर्नबीने स्वतःचे पद पणाला लावून तयार केलेला रस्ता, ‘हॉर्नबी व्हेलार्ड’..! आजचा लाला लजपतराय मार्ग..!! या रस्त्याला त्याच्या निर्मात्याचे नाव त्यावेळच्या मुंबईकर जनतेने दिले होते.

हा रस्ता व त्याखालचा बांध बांधल्यामुळे नक्की काय झालं? तर, आज आपल्याला जो रेसकोर्स, पटेल स्टेडियम पासून पुढे पूर्वेला भायखळा, माझगाव पर्यंतचा जो विस्तृत टापू दिसतो तो निर्माण झाला..जवळपास ४०००० एकर नवीन जमीन यामुळे निर्माण झाली असे गोविंद मडगावकरांनी त्यांच्या ‘मुंबईचे वर्णन’ या पुस्तकात नोंदले आहे..आज मध्य मुंबई नावाने जो भाग ओळखला जातो तो हा भूप्रदेश..धगधगत्या मुंबईचा धडकता आत्मा..एवढी मोठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे साहजिकच वस्ती-व्यापार वाढला…पूर्वी या ठिकाणी उथळ खाजण व दलदलीची जमीन असल्याने नित्यनेमाने होणारी रोगराई आटोक्यातच आली नाही तर संपली..मुंबई भरणी करून एकसंघ करण्याचा जो मोठा प्रोजेक्ट हॉर्नबीने राबवला तो देशातील पहिला मोठ्या स्वरूपाचा इंजिनीअरिंग प्रोजेक्ट ठरला..पुढे कालांतराने सर्वच बेटात भरणी करून नवीन जमीन तयार करण्यात अली आणि मुंबईला तिला स्वतःची जमीन मिळाली त्याची ही सुरस कथा..!

जाता जाता –

विलियम हॉर्नबी याला या प्रचंड बांधकामासाठी लागणारी रक्कम मिस रोज नेसबीट या अतिश्रीमंत बाईने पुरवली होती असा उल्लेख गोविंद मडगावकरांनी केला आहे. या बीची कहाणी शोधण्याचा मी प्रयत्न केला असता तीने या कामी हॉर्नबीला पैसे पुरवले असण्याची शक्यता नाकारता येत नाही..या बाईची प्रचंड मालमत्ता असून ती मुंबईतील सर्वच बेटांवर पसरलेली होती..त्या मालमत्तेची देखभाल करणे तिलाही दळण-वळणाच्या दृष्टीने कठीणच होत असणार. आपलीही सोय होईल हा ‘स्वार्थातून परमार्थ’ साधणारा विचार करून तीने पैसे दिले असतील कदाचित..मुंबईच्या प्रसिद्ध ‘माहीम कॉजवे’ची निर्मितीही लेडी जमशेदजींच्या हातून अशीच झालेली आहे. मिस नेसबिट यांच्या नावाने माझगावात आजही एक मोठा रस्ता आहे. जेजे हॉस्पिटलचा फ्लाय ओव्हर उतरून आपण दादरच्या दिशेने यायला निघालो की भायखळ्याचा ‘खडा पारशी’चा ब्रिज चढण्यापूर्वी आपल्याला ‘इस्माईल मर्चंट’ चौकातला सिग्नल लागतो. या सिग्नलपासून जो रस्ता पुढे माझगावात जातो तो ‘नेसबिट रोड’. याच रस्त्यावर पुढे ‘सेंट अॅन’स चर्च’ व ‘सेंट मेरी इन्स्टिट्यूट’ लागते तिथे मिस नेसबिटच्या अस्थी पुरलेल्या आहेत. सेंट अॅन’स चर्च हे पूर्वी मिस नेसबिटने बांधलेलं छोटं चॅपेल होत ते नंतर चर्च मध्ये रुपांतरीत झालं.

विलियम हॉर्नबीने बांधलेल्या या बांधामुळे ‘Breach Candy’ या मुंबईच्या गर्भश्रीमंत उच्चभ्रूंच्या मशहूर निवासी भागाचा जन्म झाला. मुंबई व वरळी दरम्यानच्या या समुद्राच्या खुल्या भागाला इंग्रज ‘The Great Breach” असे म्हणायचे.. Breach या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ ‘मोडणे” किंवा ‘भगदाड’ असा होतो..सोबतची Candy मराठी ‘खिंडार’चा अपभ्रंश असण्याची शक्यता आहे..जमिनीला समुद्रापाशी असलेले मोठे भगदाड या अर्थाने Breach Candy हा शब्द वापरला जायचा. सन १७८४-८५ च्या आसपास हा बांध पूर्ण होऊन मुंबईत मोठ्या प्रमाणावर जमीन निर्माण झाली आणि फोर्ट माझगावात दाटीवाटीने वसलेली वस्ती मोकळी होऊन आताच्या पेडर रोड, महालक्ष्मी नजीकच्या भागात प्रशस्त जागी राहण्यास येऊ लागली..येणारे अर्थातच युरोपियन अधिकारी, देशी मोठे व्यापारी किंवा श्रीमान संस्थानिक-राजे-राजवाडे होते..मोठे महाल, वाड्या, हवेल्या इथे उठू लागल्या आणि हा विभाग मुंबईच्या अतिश्रीमंत लोकांचा म्हणून जाणला जायला लागला तो अगदी आज पर्यंत..आजही या परिसरात काही मोठे महाल, पॅलेस जीर्णावस्थेत दिसतात ते त्याकाळचे अवशेष आहेत..

त्याकाळी चार-पाच लाख रुपये खर्चून बांधलेल्या या बांधाने मुंबईला केवळ तिची ‘जमीन’च मिळवून दिली नाही तर मुंबईला ‘महामुंबई’ होण्याचा मार्ग खुला केला..गोष्ट खरी-खोटी कोण जाणे, परंतु मुंबईला आकार देण्याच्या कैफात स्वतःच गव्हर्नरपद धाब्यावर बसवलेला विलियम हॉर्नबी हा मुंबईचा पहिला गव्हर्नर. दुसरा आपण मागच्या एका भागात पाहिलेला आर्थर क्राफर्ङ. आता कधी त्या रस्त्यावरून येण-जाणं झाल्यास विलियम हॉर्नबीची आठवण काढण्यास विसरू नका..याच रस्त्याने मुंबईकरांचं मोठ दैवत ‘महालक्ष्मी’ला जन्म दिला, त्याची कहाणी पुढच्या भागात..

-गणेश साळुंखे
9321811091

संदर्भ –
१. ‘मुंबईचे वर्णन’, ले. गोविन्द डगावकर -१८६२
२. ‘मुंबईचा वृत्तांत’, ले. शिंगणे – आचार्य १८९३

— मुंबईतील इतिहासाच्या पाऊलखुणा लेखमाला – लेख १८ वा –

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..