नवीन लेखन...

मेवाती घराण्याचे गायक संजीव अभ्यंकर

वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांचे हिंदुस्तानी संगीताचे शिक्षण सुरू झाले. त्यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९६९ रोजी झाला. त्यांना सुरुवातीचे सांगीतिक धडे घरातून, आई शोभा अभ्यंकर यांच्याकडून मिळाले. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतले. हिराबाई बडोदेकर आणि वसंतराव देशपांडे यांनी त्यांना जसराजांकडे शिकायला पाठविण्याची शिफारस केली. जसराजांचे शिष्यत्व स्वीकारल्यानंतर त्यांची संगीत दिनचर्या संपूर्णत: बदलली. गुरु-शिष्य परंपरेनुसार त्यांचे शिक्षण चालू झाले. जसराजांच्याबरोबर भारतभर दौरे, संगीत मैफिलींमध्ये त्यांना साथ-संगत आणि त्याचवेळी हिंदुस्तानी संगीतातील अभिजात स्वरांचे धडे, अशा नानाविध मार्गांनी त्यांची सांगीतिक प्रगती होत होती. अकराव्या वर्षी संगीताची पहिली मैफल गाजविणाऱ्या संजीव अभ्यंकरांनी त्यानंतर देशभरातील विविध महोत्सवांमध्ये आपल्या गायकीची छाप पाडली.

ते जेव्हा जसराजांकडे राहत होते तेव्हा आपले आपण उठून शिष्यांनी रियाजाच्या खोलीत रियाज सुरू करावा, अशी जसराजांची शिकवण होती. त्यांच्या घराच्या गच्चीत रियाजाची छोटी खोली होती. तिथे जाऊन ते गायला बसायचे, त्यांना मनात येईल तेव्हा जसराज यायचे आणि शिकवायचे. त्यांनी शिकवलेले सकाळ, दुपार, संध्याकाळ असे तीन वेळा गायचे असा नियम होता. त्या त्या वेळचे राग म्हणायचे. मधल्या वेळात संजीव क्रिकेट खेळायला मामाकडे जायचे. रोज तेव्हा चार ते साडेचार तास गायन व्हायचे. त्यावेळी गळा तयार करायचा होता त्यामुळे सगळे राग गळ्यावर चढवायचा रियाज असायचा.
देशभरातील प्रख्यात संगीत महोत्सवच नाहीत, तर अमेरिकेत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व पूर्व आफ्रिका या भागांतही संजीव अभ्यंकरांची गायकी पोचली आहे.

शास्त्रीय गायनासोबत आजकाल ते स्वत:च्या स्वतंत्र अल्बममधील अभंग, भजने, भावगीते असे प्रकारही सादर करतात हे लक्षात येत आहे. या सुगम संगीतावरही त्यांच्या सुरेल गायकीची मोहर उमटली आहे. हा त्यातील विशेष उल्लेखनीय भाग ठरावा. हिंदी-मराठी भजने आणि बंदिशींच्या अनेक कॅसेट आणि सी.डीच्या माध्यमांतून देशभरातील संगीतरसिकांच्या घरांत त्यांचे नाव पोचले आहे. स्वतःच्या काही बंदिशी रचून स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न ही त्यांनी केला. ‘माचिस’, ‘निदान’, ‘दिल पे मत ले यार’ अशा चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले आहे. ‘गॉडमदर’ चित्रपटातील गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पं. संजीव अभ्यंकर हे आजचे आघाडीचे नव्या दमाचे चतुरस्र गायक म्हणून परिचित आहेत.

विविध रागांचा विविधांगी अभ्यास करत त्यांनी मेहनतीतून आज नवीन पिढीतील महत्त्वाचे गायक म्हणून स्थान मिळवलं आहे. पं. जसराज यांचे पट्टशिष्य आज अगदी कीर्ती शिखरावर विराजमान आहेत म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. अतिशय गोड गळा, पल्लेदारपणा आणि स्वरांचा दाणेदारपणा ही त्यांची गानवैशिष्टय़े त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमातून लक्षात येतात. पं. संजीव अभ्यंकर आणखी एक वैशिष्टय़ सांगता येईल की, बहुतांश कार्यक्रमात ते नव्या रागांचा नवा संच निवडतात. पं. जसराज जीवनगौरव पुरस्कार, सूररत्न यांसारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. मध्य प्रदेश शासनाने ‘कुमार गंधर्व पुरस्कार’ देऊन त्यांना गौरवले आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव अभ्यंकर यांच्या वेबसाईटवर त्यांचे सर्व गायन आपणास ऐकता येते.
http://www.sanjeevabhyankar.com

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..