नवीन लेखन...

मजरुह सुलतानपुरी

Majrooh Sultanpuri

आझमगड गावात एक तरुण हकिमीचा व्यवसाय करायचा. याला शायरीची मनापासून आवड. अडल्यानडल्या रुग्णांची सेवा करताना याची शायरी सुरूच असायची. याच्या शायरीच्या जादूने रुग्णाचा निम्मा आजार कमी व्हायचा. या शायरीच्या वेडातूनच हसरालूल हसन पुढे मजरुह सुलतानपुरी झाला. मजरुह म्हणजे जखमी किंवा घायाळ करणारा. त्यांचा जन्म १ ऑक्टोबर १९१९ रोजी सुलतानपूर उत्तर प्रदेश येथे झाला. मजरुहच्या गीतांनी रसिकांना प्रेमळ जखमा दिल्या. त्याच्या गीताच्या जादूने कर्णसेनांना घायाळ केले. प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक ए. आर. कारदार यांनी एका मुशायर्याात हसन यांची शायरी ऐकली. त्या वेळी ते ‘शहाजहान’ चित्रपटाच्या निर्मितीत होते. त्यांनी हसन ऊर्फ मजरुह सुलतानपुरीला गीतलेखन करण्याची ऑफर दिली. मजरुह यांनी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. मजरुहने लेखणी उचलली आणि कागदावर शब्द उमटवले… ‘गम दिये मुस्तकिल, कितना नाजूक है दिल… ये न जाना… हाये हाये ये जालिम जमाना.’ ‘शहाजहान’चे संगीतकार नौशाद यांनी वाहवा केली. नौशाद यांनी त्या खुशीतच चाल बांधली. पुढे कुंदनलाल सैगल यांच्या दर्दभर्या. आवाजाने मजरुह यांच्या शब्दाला आगळे गहिरेपण दिले. मजरुह यांच्या या पहिल्या गीतरूपी रेशमी बाणाने रसिकांना घायाळ केले. हे कमी की काय, म्हणून मजरुहने पुढील गाण्यांची सुरुवात केली, ‘जब दिल ही टूट गया, हम जी कर क्या करे…’ तिच्या एका नकाराने, सर्वस्व हरपल्याची भावना मजरुह यांनी अशी व्यक्त केली. सैगलच्या आवाजातला या शब्दांतला दर्द काळीज पिळवटणारा ठरला. मजरुह यांच्या घायाळ करणार्यां कारकीर्दीचा प्रारंभच असा धडाक्यात झाला. साध्या, सोप्या परंतु काळजाला भिडणार्याय शब्दांची सुरेख गुंफण ही मजरुह यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये. पर्शियन शब्दांचा समर्पक वापर त्यांनी चपखलपणे केला. याच वैशिष्ट्यांमुळे चार पिढ्या त्यांच्या गीतांच्या चाहत्या बनल्या. मजरुह यांच्या ‘शायराना’ स्वभावामुळे जवळपास सर्वच संगीतकारांबरोबर त्यांचे सुरेल नाते जमले. ‘शहाजहान’मध्ये काळीज चिरणारे वर्णन करणारी त्यांची लेखणी ‘आरपार’च्या वेळी मात्र प्रेमळ आणि हळवी झाली. तो आणि ती यांच्या नजरेच्या भाषेला, ‘कभी आर कभी पार लागा तीर ए नजर…’ असा रेशमी बाणाचा उपमात्मक आविष्कार झाल्यानंतर ‘बाबूजी धीरे चलना…’मधून प्रेमात कशी जपून पावले टाकायची, याची एवढी मधाळ जाणीव मजरुहच देऊ जाणे. मग ओपींचे ठेकेदार संगीत आणि मजरुह यांचे शब्द यांची कानसेनांना भुरळ पाडणारी जुगलबंदी सुरू झाली. ‘सीआयडी’मध्ये याचा प्रत्यय आला. ‘लेके पहला पहला प्यार…’ अशी प्रेमाची ग्वाही असो, ‘कहीं पे निगाहे कहीं पे निशाना…’मधली सूचकता असो, ‘आँखों ही आँखों में इशारा हो गया…’मधला जीवन जगण्याचा मार्ग असो; मजरुह यांच्या गीतांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या ‘दोस्ती’ला मजरुह यांच्या गीतांनी जो अर्थ प्राप्त झाला, त्याला तोडच नव्हती. ‘चाहूंगा मैं तुझे साँज सबेरे’, ‘मेरी दोस्ती मेरा प्यार…’, ‘राही मनवा दुख की चिंता…’ या गाण्यांनी इतिहास रचला. त्यानंतर मजरुहची जोडी जमली ती चतुरस्र आरडी बर्मनबरोबर. ‘ओ मेरे सोना…’, ‘आजा आजा मैं हूँ प्यार तेरा…’(तीसरी मंजिल), ‘पिया तू अब तो आजा…’, ‘चढती जवानी…’, ‘कितना प्यारा वादा…’, ‘दिलबर दिल से प्यारे…’, ‘गोरिया कहां तेरा देस रे…’(कांरवा), ‘चुरा लिया है…’, ‘लेकर हम दीवाना दिल…’, ‘आपके कमरे मे…’, ‘मेरीसोनी…’(यादों की बारात), ‘क्या हुआ तेरा वादा…’, ‘बचना ए हसीनों…’, ‘चांद मेरा दिल…’, ‘ए लडका हाय अल्ला…’

(हम किसीसे कम नहीं), ‘निसुल्ताना रे…’, ‘तुम बिन जाऊं कहां…’(प्यार का मौसम),
‘होगा तुम से प्यारा कौन…’, ‘पूछो ना यार क्या हुआ…’(जमाने को दिखाना है) ही या कॉम्बिनेशनची कामगिरी.

आनंद-मिलिंद, जतीन-ललित यांच्या संगीताने नटलेली मजरुह यांची अनेक गाणी गाजली.अष्टपैलुत्व हे त्यांच्या लेखणीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. चित्रपटातील सिच्युएशननुसार गीतलेखन करण्यात मजरुह यांचा हातखंडा. ‘तेरे मेरे मिलन की रैना…’(अभिमान)मधला भाव वेगळा, तर ‘जाइए आप कहां जायेंगे…’(मेरे सनम)मधला लडिवाळ गोडवा पुन:पुन्हा ऐकावासा वाटणारा. ‘रात अकेली है…’(ज्वेल थीफ)मधले आव्हान कानाला सुखावणारे, तर ‘रहे ना रहे हम…’(ममता) मधले औदासीन्य विचार करायला लावणारे. प्रत्यक्ष आयुष्यात ते नौशाद यांचे व्याही होते, पण सिनेमाच्या सुवर्णयुगात या दोघांनी एकत्र काम केलेच नाही. अंदाज (१९९४) नंतर तब्बल २० वर्षांनी साथी (१९६९) मध्ये ते एकत्र आले. कारकीर्दीच्या प्रारंभीच्या काळात कम्युनिस्ट चळवळीत भाग घेणार्याब मजरुह यांनी एकदा पंडित नेहरूंबद्दल अनुदारात्मक काव्य केले. त्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला. मजरुह सुलतानपुरी हे दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे पहिला गीतकार! मजरुह सुलतानपुरी यांचे २४ मे २००० रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

मजरुह सुलतानपुरी यांची गाणी.

https://www.youtube.com/watch?v=due-RD_qP9o

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..