नवीन लेखन...

गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित ‘लेकुरे उदंड जाली’ ची पन्नाशी

Golden Jubilee of 'Lekure Udand Jhali'

३० ऑक्टोबर १९६६ रोजी दि गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मो. ग. रांगणेकर दिग्दर्शित
‘लेकुरे  उदंड जाली’ या म्युझिकल  नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला.
या घटनेला ३० ऑक्टोबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली.

मराठी रंगभूमीवरील या आगळ्या नाटकाला संगीत पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी खूप उत्तम प्रकारे नाटकातील सर्व गाण्यांच्या चाली बांधल्या होत्या. ताल, सूर व शब्द सगळे कसे चपखल बसवले होते. या नाटकातील मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्रा या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला होता.

वसंत कानेटकर यांनी ‘मूल नसलेले दाम्पत्य’ हा गंभीर सामाजिक विषय अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला होता. विषय गंभीर असला तरी त्याची मांडणी हलक्याफुलक्या पद्धतीने करण्यात आली होती. नाटक हलकेफुलके, गाणी असणारे असले तरी त्याचा मूळ विषय प्रेक्षकांपर्यंत सुंदर पणे पोहोचला. मा.श्रीकांत मोघे व मा कल्पना देशपांडे हे मुख्य कलाकार होते.

‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकाचा पुनरुज्जीवित प्रयोग २५ मे १९७३ रोजी झाला. मूळ नाटकातील श्रीकांत मोघे यांच्यासह अन्य काही कलाकार या प्रयोगातही होते. मूळ प्रयोगात ‘मधुराणी’ची भूमिका कल्पना देशपांडे करत होत्या. पुनरुज्जीवित झालेल्या ‘लेकुरे..’मध्ये ही भूमिका मा.दया डोंगरे यांना मिळाली. गिरगावातील साहित्य संघ मंदिरात या पुनरुज्जीवित नाटकाचा पहिला प्रयोग झाला. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’नेच हे नाटक दीर्घकालावधीनंतर पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर केले होते. भोलाराम आठवले (धटिंगण गुरुजी), बाबा महाडिक (डॉ. अष्टपुत्रे), प्रकाश इनामदार (गोरा), प्रवीण पाटील (मारोतराव), मोहनदास सुखटणकर (दासोपंत), कुमुद दामले (सोनुताई), श्रीपाद जोशी (व्यंकटराव), विजया धनेश्वर (तिलोत्तमा) आदी कलाकार नाटकात होते. सुरुवातीच्या प्रयोगात मंदाकिनी भडभडे या ‘सोनुताई’ करत होत्या, तर विठ्ठल पणदूरकर हे ‘दासोपत’ करत होते.

दया डोंगरे या नाटकाची आठवण सांगताना म्हणतात.

शिवाजी मंदिरच्या प्रयोगाच्या वेळची एक आठवण आहे. नाटकात –

‘मी बोलले तर होते वाईट,
पण आहे का यांना त्याचे काही,
तुम्ही माहेरचे म्हणूनच सांगते बाई
यांना माणसांची पारखच नाही..’
असे एक गाणे होते. शिवाजी मंदिरच्या त्या  प्रयोगाला काहीतरी गडबड झाली आणि गाणे सुरू झाले आणि रेकॉर्डरमधून वायर निघाली. गाणे अचानक थांबले आणि मी क्षणभर ‘ब्लँक’ झाले. पण लगेचच पुढचे शब्द मी म्हणायला सुरुवात केली. त्याच वेळी तिकडे ध्वनिमुद्रित संगीत सुरू झाले. मी  त्याचा अंदाज घेऊन पुढचे गाणे त्या ‘ट्रॅक’वर जुळवून घेऊन म्हटले. वसंत कानेटकर, सी. रामचंद्र, पं. जीतेंद्र अभिषेकी, दिलीपकुमार, वैजयंतीमाला अशा मान्यवरांनी आमचा हा ‘लेकुरे’चा प्रयोग पाहिला.  नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नाटकाबाबतची एक विशेष बाब आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, शिकागो, बोस्टन, डेट्रॉईट, टोरांटो या ठिकाणी आमच्या ‘लेकुरे’चे प्रयोग झाले. सातासमुद्रापार गेलेल्या या पहिल्या मराठी नाटकात मी होते याचा मला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या दौऱ्यासाठी कोणीही प्रायोजक नव्हता. आम्ही सर्व कलाकारांनी स्वत:च्या पदरचे पैसे घालून हा दौरा ठरवला होता. येण्या-जाण्याचा खर्च आम्हीच करणार होतो. प्रयोगाची तांत्रिक व्यवस्था आम्ही कलाकारच सांभाळणार होतो. तेथील काही मराठी मंडळींकडून आमची निवासाची आणि जेवणखाणाची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तिकडे गेल्यावर हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही आणि आमची भलतीच पंचाईत झाली. ठरल्याप्रमाणे आम्ही पहिला प्रयोग केला आणि पुढचे प्रयोग करायचे की नाही, यावर चर्चा झाली. पण सर्वानुमते प्रयोग करायचे ठरले. आमचा सगळा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांमध्ये ताट फिरवत होतो. त्यात जे पैसे जमा व्हायचे ती रक्कम प्रयोगातील सर्व कलाकारांमध्ये समान वाटप केली जायची. त्यामुळे कमावणे तर सोडाच; पण गमावण्याची वेळ आली होती. प्रयोगादरम्यान एका अमेरिकन महिलेने आम्हा सगळ्या कलाकारांना तिच्या घरी जेवायला बोलावले आणि चक्क श्रीखंड-पुरीचे जेवण करून घातले. हा अपवाद करता आमच्या या अमेरिकन दौऱ्याचा अनुभव विदारक होता.

नंतर सुयोग’ नाटय़संस्थेतर्फे १९९५-९६ च्या सुमारास ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक पुन्हा एकदा नव्याने रंगमंचावर सादर केले. यात मा.प्रशांत दामले आणि सुकन्या कुलकर्णी-मोने प्रमुख भूमीका केल्या होत्या.

प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीत सांगीतले आहे. त्यात जी गाणी होती ती जुन्या काळची आणि अवघड होती. त्याचबरोबर त्यातले पल्लेदार संवादही महत्त्वाचे होते. त्या नाटकाच्या एका प्रयोगाला पु. ल. देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी आले होते. त्यांच्यासमोर प्रयोग करताना आणि त्यांनी चाल लावलेली गाणी म्हणताना मला दडपण आलं होतं, पण मी प्रयोग नेमकेपणानं केला. पुलं. आणि अभिषेकी बुवांनी प्रयोग संपल्यानंतर माझं कौतुक केलं, तो क्षण मी कधीच विसरणार नाही.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..