नवीन लेखन...

शंभर वर्षांपुर्वीचं गिरगाव

Girgaon - 100 Years Back

मुंबईतलं गिरगाव म्हणजे समुद्राच्या विरूद्ध बाजूला चर्नीरोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतरचा परिसर. हा भाग तसा फोर्ट विभागापासून दूर म्हणजे अगदी सुरूवातीस पाहता इंग्रजांच्या दृष्टीने तसा गावाच्या बाहेरचा किंवा वेशीवरचा भाग. इथे इंग्रजांचं लक्ष दुरूनच असे. गिरगावचा परिसर हा वेगवेगळ्या वाड्यांनी बनलेला आहे. कांदेवाडी (खाडिलकर मार्ग), केळेवाडी (डॉ. भालेराव मार्ग), फणसवाडी, गायवाडी, खोताची वाडी, झावबाची वाडी वगैरे वाड्यांचा पुंजका मिळून गिरगाव बनलेलं आहे.

गिरगावला गिरगाव का म्हणतात, तर काहींच्या मते मलबार हिलवरून पाहिलं तर पायथ्याशी गिरगाव दिसतं. गिरी म्हणजे डोंगर, आणि त्याच्या पायथ्याशी असलेलं गाव म्हणून नाव गिरगाव झालं असा अंदाज लावला जातो.

चर्नीरोड का, तर तिथे गुरं चरायला येत असत. म्हणून त्याला चर्नीरोड म्हंटलं जातं असे संदर्भ १९०० सालापुर्वीच्या काही जुन्या पुस्तकांमध्ये आढळतात. चरायला गाई येत असत म्हणून तिथे गायवाडी आहे. पण हा भाग फळे, भाज्या आणि अन्य किरकोळ वस्तुंच्या छोटेखानी बाजारपेठेचाही होता असं मानायला जागा आहे.

म्हणजे केळेवाडीत केळ्यांचा बाजार, तर कांदेवाडीत कांद्याची गोदामे तेव्हा होती म्हणून त्या त्या विभागांची नावे त्यावरून पडली. फणसवाडी, काकडवाडी ह्याही तशाच वाड्या. फणसवाडीत फणसाच्या झाडांची रेलचेल होती. तर काकडवाडीत काकडी पिकवली जाई.

मुगभाटात मुगाची लागवड होत असे म्हणून त्याला मुगभाट नाव पडलं. गिरगावातून सोनापूरकडे जाणारी गल्ली म्हणजे ताडवाडी. तिथल्या ताडांच्या झाडांवरून ते नाव पडलं. बोरभाट लेन मध्ये बोराच्या झाडांची गर्दी होती. म्हणून तो भाग बोरभाट लेन झाला.

चंदनवाडी परिसरात चंदन विकणारे विक्रेते बसत असत. त्यामुळे तो परिसर चंदनवाडी झाला. म्हणजेच गिरगावचा परिसर हा ब्रिटीशांच्या काळापासून तसा उजाड, गाई चरण्याचा, झाडांचा, पिकं घेण्याचा आणि मलबार हिलवरून खाली पाहिल्यानंतर एखाद्या गावासारखा दिसणारा होता.

आज एखाद्या चौकाला कोणाचं नाव द्यायचं म्हंटलं की राजकारण होतं, आणि शंभर नावं पुढे येतात. पण तेव्हाच्या उजाड प्रदेशाला कोणाचं नाव द्यायचं हा तेव्हा प्रश्नच असणार. त्यामुळे लोकांनीच कांदे, केळे, ताड, फणस, चंदन वगैरेवरून त्या त्या वाड्यांचं म्हणजे विभागांचं किंवा लेनचं बारसं करून टाकलेलं होतं.

गिरगावात काही विभाग मात्र वेगळ्या नावाचे आहेत. उदाहरणार्थ सदाशिव स्ट्रीट किंवा त्याला रेशम गल्ली असंही म्हणतात. पाठारे प्रभू ज्ञातीतील कुणा सदाशिव नामक गृहस्थांची जमिन ह्या भागात होती, म्हणून त्याला सदाशिव स्ट्रीट नाव पडलं. पण त्या भागात रेशीम विणणारे विणकरही रहात असत. त्यामुळे कुणी त्याचं नाव रेशम गल्ली असंही ठेवलं. गिरगावचा ठाकूरद्वार नाका तर प्रसिद्धच. कोणत्याही मंदिराच्या प्रवेशद्वाराला ठाकूरद्वार म्हणण्याची पद्धत तेव्हा होती. ह्या भागात एक रामाचं मंदिर होतं. तिथे आत्माराम बाबा नावाचा एक साधू रहात असे. १८३६ साली वयाच्या ९० व्या वर्षी तो वारला. त्यामुळे काही लोक त्या भागाला आत्माराम बाबा ठाकूरद्वार असेही म्हणत असत.

गिरगावचा बनाम हॉल लेन हा विभागही प्रसिद्ध. त्याला बनाम हॉल असं नाव का पडलं याची हकीगत मनोरंजक आहे. त्या काळी चर्नीरोडचा विभाग समुद्रापासूनच नारळाच्या झाडांनी भरलेला होता. नारळाच्या बनाच्या सन्निध्यातलं घर म्हणजे बनमहाल किंवा वनमहाल असे म्हंटले जाई. घर भले लहानसेच असे पण त्याला महाल म्हणण्याचा तेव्हापासूनचा प्रघात .

त्यावेळी म्हणजे १८९० ते १८९५ ह्या काळात अकवर्थ नावाचे ब्रिटीश गृहस्थ मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. त्यांना ह्या भागातून काही लोक पत्र पाठवत असत. त्या पत्रांवरील पत्त्यांमध्ये बनमहाल हे घराचे नाव पाहिले की त्यांना गंमत वाटे.

कारण ते ज्या बंगल्यात रहात होते त्याचे नाव बेनहॅम असे होते. त्यांना वाटले की बनमहाल पेक्षा बेनहॅम हॉल असे नाव चांगले आहे. त्यांच्या इच्छेनेच मग बनमहाल लेनचे नाव बेनहॅम हॉल लेन आणि नंतर बनाम हॉल लेन होऊन गेले. पारतंत्र्यात इंग्रजांची इच्छा कशी चालत असे याचे ते एक उदाहरण.

गिरगावातील भाई जीवनजी लेन ही भाई जीवनजी ह्या गृहस्थांच्या नावे आहे. हे भाई जीवनजी त्या काळचे प्रसिद्ध क्रॉफर्ड सॉलीसिटर यांच्याकडे कारकून म्हणून काम करीत. त्यांना पुस्तके जमविण्याचा छंद होता. भाई जीवनजी तसे चांगली स्थावर जंगम मालमत्ता बाळगून होते.

मुंबईतच ठिकठिकाणी त्यांच्या मालकीची बरीच जमिन होती. १९०६ साली ते वारले. त्यांच्या नंतर मग त्यांनी जमविलेली पुस्तकेही विखुरली गेली. काही काळ चर्नीरोडचं नाव ऑलीवंट रोड असंही होतं. सर एडवर्ड चार्लस केल ऑलीवंट हे १८८१ ते १८९० ह्या काळात मुंबई पालिकेचे आयुक्त होते. पुढे १८९२ च्या सुमारास ऑलीवंट गुजरातमध्ये राजकोट भागात पोलिटीकल एजंट म्हणून गेले. याच सुमारास ऑलीवंट यांचा आणि गांधीजींचा काहीतरी वादविवाद झाला. गांधीजी तेव्हा एक तरूण बॅरिस्टर होते. ऑलीवंट आणि गांधीजींचा वाद असा विकोपाला गेला की गांधीजींना ऑलीवंटनी खोलीतून बाहेर काढले. त्या रागानेच गांधीजी मग दक्षिण आफ्रिकेत गेले असे म्हंटले जाते.

गिरगावातील खोताची वाडीही सर्वज्ञात आहे. खोत म्हणजे सरकारची जमिन भाड्याने घेणारे आणि सरकारला पैसे देणारे. ती जमिन इतरांना भाड्याने देऊन त्या भाड्यातून सरकारचं भाडं काढून बाकीची रक्कम खिशात घालण्यात पटाईत असलेली विशेषतः कोकण गाजवलेली मंडळी. जमिन इतरांना लीजवर देताना ते लीज कायमचे असे. करारात उल्लेख केला जाई की सुर्य चंद्र असेपर्यंत हे लीज चालत राहील. तर अशी ही खोताची वाडी.

गिरगावातून थोडं पुढे जावं तर तिथे काळबादेवी आणि त्याला लागून धोबीतलाव. काळबादेवी ही मूळ माहीम येथे होती. तिथे मुसलमानांपासून त्रास सुरू झाल्यानंतर ती माहिमहून हलवून मुंबईत धोबीतलावाजवळ आणली गेली. १८४० मध्ये प्रसिद्ध झालेल्या टाईम्सच्या अंकात तिचा उल्लेख कुलबा देवी असा केला गेला आहे. कुलबा देवी किंवा कालिका देवीचं हे मंदिर अगदी रस्त्याचा भाग अडवून बांधण्यात आलं होतं. मंदिरामुळे तेथील रस्ता बांधणं अवघड झाल्याने मंदिराचे मालक रघुनाथ जोशी यांना बाबापुता करून मंदिराचा काही भाग रस्त्यासाठी मोकळा केला गेला. मंदिरे बांधून रस्ते अडवणे हा प्रकार मुंबईत अलिकडे सुरू झाला आहे असं नाही हे यावरून लक्षात येतं.

धोबीतलावावर बराच काळपर्यंत धुणी धुणारे धोबी हे नंतर आझाद मैदानाशी (तेव्हा एक्सप्लनेड मैदान) असलेल्या विहीरीवर जाऊ लागले. नंतर हा तलाव बुजवला गेला. धोबीतलावाचं नाव होतं फ्रामजी कावसजी टँक. १८३९ साली जेव्हा ह्या तलावाची पुनर्बांधणी करायची होती तेव्हा त्यासाठी उदार हस्ते मदत करणाऱ्या फ्रामजी कावसजी यांचे नाव त्या तलावाला देण्यांत आले. सरकारने त्यांचे नाव देण्याचा रितसर आदेशच तेव्हा काढल्याची नोंद आहे.

चर्नीरोडच्या शेजारचं स्टेशन ग्रँटरोडसंबंधी महत्त्वाची माहिती घेतल्याशिवाय गिरगावचा आसपासचा परिसर पुर्ण होणार नाही. सन १८३५ ते १८३८ ह्या काळात सर रॉबर्ट ग्रँट हे मुंबईचे गव्हर्नर होते. खरं तर ग्रँटरोडचा परिसर हा ओसाडच होता. तिथे जाणंही दुरापास्त वाटावं अशा त्या विभागात रस्ता बांधून तो गिरगावला जोडण्याचं काम गव्हर्नर ग्रँट यांनी केलं. मुंबईच्या टाईम्स ऑफ इंडियाच्या दिनांक १९ ऑक्टोबर १८३९ च्या अंकात बातमी आहे की ग्रँट रोडचा रस्ता १ ऑक्टोबर १८३९ पासून रहदारीला खुला करण्यांत आला. गिरगावात जगन्नाथ शंकरशेट यांची बगीचायुक्त हवेली होती. त्याच्या बाजूने दगडाच्या बांधकामाने उंची वाढवून हा रस्ता तयार करण्यांत आला. सर रॉबर्ट ग्रँट यांचे वडिल चार्लस ग्रँट हे ब्रिटीशांच्या ईस्ट इंडिया कंपनीचे डायरेक्टर होते.

सर रॉबर्ट ग्रँट आपली गव्हर्नरपदाची कारकीर्द चालू असतानाच दापोडी (पुणे) येथे वयाच्या ५९ व्या वर्षी १८३८ साली वारले. रस्ता त्यांच्या पश्चात सुरू झाला व त्याला त्यांचे नाव देण्यांत आले. ग्रँट मेडिकल कॉलेजमधील ग्रँटही तेच. ग्रँट मेडिकल कॉलेज हे भारतातील दुसरे सर्वांत जुने वैद्यकीय महाविद्यालय. ते बांधले जमशेदजी जिजिभॉय यांनी. पण त्याला त्यांनी स्वतःचे किंवा आपल्या कुटुंबियांचे नाव न देता, सर रॉबर्ट ग्रँट यांचे नाव दिले.

रॉबर्ट ग्रँट यांचे वडिल चार्लस ग्रँट हे ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टर बोर्डाचे चेअरमन होते. रॉबर्ट ग्रँट यांचा जन्म (१७७९) आणि मृत्यू (१८३८) भारतातला. लहानपणी १७९० मध्ये ते वडिलांबरोबर इंग्लंडला परत गेले व तेथे शिकून नंतर वकील झाले. १८१८ साली ते इंग्लंडचे संसद सदस्य म्हणून निवडून आले.

तेथे बराच काळ राजकारणात राहिल्यानंतर १८३४ साली ते मुंबईचे गव्हर्नर म्हणून भारतात परत आले. ते उत्तम कवीही होते. त्यांची Oh, Worship the King ही इंग्रजी कविता जगप्रसिद्ध आहे. Sacred poems हा त्यांच्या कवितेचा संग्रह प्रसिद्धही आहे. अतिशय हुशार व अनुभवी अशा ह्या माणसाने १८१३ साली एक ४५० पानांचे पुस्तक लिहीले होते.त्यात ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील कारभार व व्यापार यासंबंधी सखोल माहिती दिलेली आहे. मुंबईत प्रवास करताना आपण अनेकदा ग्रँटरोड स्टेशनातून गेलो असू. पण ग्रँटरोडला ज्याचे नाव दिले आहे त्या ग्रँटविषयी इतकी सविस्तर माहिती क्वचितच कोणाला असेल…

एक गिरगांवकर

सौजन्य : अजय कुंभार

श्री. उदय सप्रे यांनी WhatsApp द्वारे पाठवलेला लेख सौजन्य : अजय कुंभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..