नवीन लेखन...

काळानुसार बदललेले ठाणे

Changing Thane

मला कोणी विचारले की तुझे मुळ गाव कोणते तर सहजपणे माझ्या तोंडातून ठाण्याचेच नाव येते. खरंतर प्रधान कुटुंबीय मूळचे कोकणातले. मात्र आता कोकणात काहीही राहिले नाही. वाडवडिलांनी काही पिढ्यांपूर्वीच कोकण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी आपले बस्तान बसवले. त्याचप्रमाणे माझ्याही कुटुंवाचे कोकणातून ठाण्याला स्थलांतर झाले मात्र तेही व्हाया गुजरात.

माझा जन्म मुंबईतला. अगदी दादरच्या शिवाजी पार्कचा, कारण आजोळ दादरमध्ये. मात्र त्यानंतर संपूर्ण बालपणापासून मी ठाण्यातच वाढलो. अजुनही पक्का ठाणेकर आहे. मात्र मी Born and Brought Up in Thane असं म्हणू शकत नाही, पण ठाणं तर माझ्या रक्तातच भिनलंय. अजूनही साठ आणि सत्तरच्या दशकातल्या ठाण्याच्या आठवणी ताज्या असल्यासारख्या डोळ्यासमोर आहेत.

मी माझे गाव ठाणेच मानतो. ठाण्यावर माझे विलक्षण प्रेम आहे, हे ठाण्याबाहेर मी अगदी चार दिवसांसाठी गेलो तरी मला जाणवतं. बाहेरगावाहून आल्यावर ठाणे स्टेशनात पाऊल टाकताच मला अगदी माहेरी आल्यासारखं वाटतं.

माझं बालपण ठाण्याच्या आंबेडकर रोडजवळच्या मनोरपाडा भागात गेलं. पहिली शाळा दिघेबाईंची शिशु-ज्ञान मंदिर. त्यावेळी मित्रमंडळी सगळी मनोरपाडा आणि उथळसर भागातली. चवथीनंतर मो. ह विद्यालयात शिक्षण झालं. आमच्या दहावीच्या एसएससी बॅचची आम्ही मित्रमंडळी अजुनही चार-सहा महिन्यातून एकदा भेटतोच.

खरंतर हा विषय निघायला कारण एवढंच की गेले काही दिवस ठाण्यात एक मोठं स्थित्यंतर होताना दिसतंय. आमच्या ठाण्यातल्या जुन्या स्टेशन रोडचा चेहरामोहराच बदलून टाकला जातोय. सगळी अतिक्रमणं तोडून टाकत हा रस्ता मोठा केला जातोय. अर्थात हा बदल आवश्यकच आहे. जुन्या स्टेशन रोडवरुन अक्षरश: चालायला जागा मिळत नव्हती. हा रस्ता गर्दीत गुदमरुन जात होता. दोन-तीन दिवसांपूर्वी त्या रस्त्यावरुन एक फेरफटका मारला आणि लक्षात आलं की या रस्त्यावरच्या काही पाऊलखूणा आता लुप्त व्हायच्या मार्गावर आहेत. काही वर्षापूर्वी टी.चंद्रशेखर या धडाडीच्या महापालिका आयुक्तांनी ठाण्याचा चेहरामोहरा बदलून टाकला होता, त्यांची आठवण आली.

मनात विचार आला की हे बदलत असलेलं ठाणं निदान आपण जेवढं जुन्या स्वरुपात बघितलंय तेवढं तरी लिहून ठेवावं. जुन्या आठवणींना उजाळा देताना कधीतरी ही पानं वाचली जातील. मराठीसृष्टीच्या “नोस्टाल्जिया” या भागात अशाच जुन्या आठवणींचा खजिना भरुन ठेवलाय. त्यात या ठाण्याच्या जुन्या आठवणींची भर घालावी.

एक लक्षात आलं की या सगळ्याच गोष्टी काही एकाच लेखात लिहिणं शक्य नाही त्यामुळे मग एक लेखमाला लिहावी असा विचार केला. आत्तातरी पंधराएक विषय डोक्यात आहेत. यामध्ये ठाण्याचे टांगे, आता हरवलेली आईस फॅक्टरी, कल्पना केंद्र, मोहवी मधली नाटकं आणि रांगोळिची प्रदर्शनं, बी.जे. हायस्कूल या आणि अशाच बर्‍याच ठिकाणांच्या आठवणी येणार आहेत.

आपल्याही आठवणीतल्या ठाण्यातल्या जागा, वास्तू वगैरेंची महिती लिहायची असेल तर नि:संकोचपणे पाठवा, तुमच्या नाव, पत्ता आणि फोटोसहित.

तेव्हा पुढच्या भागात बघूया बदललेल्या ठाण्याच्या आठवणी.

— निनाद अरविंद प्रधान

निनाद प्रधान
About निनाद प्रधान 96 Articles
मराठीसृष्टीचे व्यवस्थापकीय संपादक. मराठी आणि इतर भारतीय भाषांमधील इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इतर अनेक सॉफ्टवेअरची निर्मिती. १९९६ साली मराठी भाषेतील पहिल्या वेबसाईटच्या निर्मितीमध्ये सहभाग. त्यानंतर अनेक मराठी आणि आणि भारतीय भाषिक वेबसाईटस बनविण्यात सहभाग. वृत्तपत्र आणि मिडियासाठी विविध सॉफ्टवेअरची निर्मिती. लोकसत्ता फॉन्टफ्रीडम आणि फॉन्टसुविधा या देवनागरीसाठीच्या अत्यंत उपयुक्त सॉफ्टवेअरची निर्मिती. अनेक वेबसाईटच्या निर्मितीत सहभाग. याच विषयावर विपुल लेखन. मराठी वृत्तपत्रांच्या इंटरनेट आवृत्तींचे सल्लागार.

1 Comment on काळानुसार बदललेले ठाणे

  1. in above article you mentioned about M.H. high school.
    May I know the batch?
    I am also from MH High school SSC pass out 1983.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..