नवीन लेखन...

श्राद्धामागील ‘श्रद्धा’

मागील भागात आपण पितृपक्षाचा कालावधी सर्वपित्री अमावस्येबद्दल जाणून घेतलं, पण याच पितृपक्षाला काही जण थोतांड मानतात, तर काही शास्त्रोक्त पद्धतीनं पूर्वजांची आठवण काढत हा पितृपक्षाचा कालावधी काटेकोरपणे पाळतात. मात्र या श्राद्ध करण्याच्या प्रथेला खरंच काही शास्त्रीय आधार आहे का, हा प्रश्न अनेकांना पडत असेल. म्हणूनच श्राद्ध करण्यामागील श्रद्धेच्या दोन्ही बाजूंची पडताळणी करणारा हा लेख.


श्राद्ध करावं की नाही?
हिंदू धर्म संस्कृतीत सणावारांना एक विशेष महत्त्व लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे पितृपक्ष आणि त्यात केल्या जाणा-या श्राद्धविधींनाही एक वेगळचं महत्त्व आहे. काही जण म्हणतात, श्राद्ध हे थोतांड आहे.
पण दुसरीकडे श्राद्धाच्या परंपरेला श्रद्धापूर्वक मानणारा समाजही आहे. काही सणावारांमधल्या रितीभातींमधल्या काही गोष्टी खटकणा-या असतात. कारण कोणत्याही गोष्टीला सिद्ध करण्यापूर्वी त्या गोष्टीच्या दोन्ही बाजूची पडताळणी करणं आवश्यक असतं. कालौघात बदलत जाणा-या आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात ‘श्राद्ध’ हा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे, असं काहींना वाटतं.
काही लोक तर स्वत:ही श्राद्ध करत नाहीत आणि दुस-यालाही श्राद्ध करू देत नाहीत. पण श्राद्ध केलंच पाहिजे किंवा केलं नाही तर काही अडचणींना समोर जावं लागतं, असा उल्लेख कुठेच मिळत नाही. उलट काही संतांनी श्राद्ध केलं पाहिजे, यावर अभंग लिहिले आहेत तर काही श्राद्ध करणं म्हणजे मूर्खपणाच आहे, असं मत आपल्या अभंगातून मांडतात. खरं तर श्राद्ध करणं किंवा न करणं, हे प्रत्येकाच्या बुद्धीला, मनाला पटत असेल आणि पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी वेळ मिळत असेल तर ते वैयक्तिक पातळीवर करणं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजाचं श्राद्धाविषयीचं मत
संPIND - KAVALAतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी समाजाचं वर्णन आपल्या शब्दांत कसं मांडलं आहे, हे संत तुकाराम गाथांमध्ये पाहायला मिळतं. संतांनी जे-जे लिहिलं, ते सारं सत्य आहे, असं मानणारे काही श्रद्धाळू आपल्या समाजात पाहायला मिळतात. संतांच्या वचनांप्रमाणेचं ते आपलं आयुष्य व्यतीत करत असतात. संत तुकाराम महाराज म्हणतात की, श्राद्ध केलं पाहिजे. तसा त्यांनी एक अभंग आपल्या गाथेमध्ये लिहिलेला आहे.
। पिंड पदावरी। दिला आपुलिया करी।
। माझे झाले गयावर्जन। फिटले पितरांचे ऋण।
। केले कर्मातर। बोंब मारली हरिहर।
। तुका म्हणे माझे। भार उतरले ओझे।

वरील अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात की, जेव्हा पूर्वजांच्या नावाने मी पिंड हातात घेऊन त्यांच्या सद्गतीसाठी प्रार्थना केली तेव्हा मला गयेच्या ठिकाणी जाऊन पिंडदान केल्याचा भास झाला आणि या पिंडामुळे माझ्या २१ कुळांतील लोकांचा उद्धार होईल असं मला वाटतं आहे.
हे र्कमकांड करतानाच मी विठुमाऊलीला ही साद घातली आहे. त्यामुळे त्या विठुमाऊलीच्या आशीर्वादाने आणि पूर्वजांच्या पुण्यकर्मामुळे माझा भार उतरला आहे आणि श्राद्ध केल्याचं समाधान प्राप्त होऊन त्यांच्या बंधनाचा भार हलका झाला आहे असं मला वाटतं. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी त्यांच्या पूर्वजांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी श्राद्ध केलं आणि हा अभंग लिहिला असावा, असं म्हणायला काही हरकत नाही.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं श्राद्धाविषयी मत
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्राद्धाविषयी मत मांडताना म्हणतात की, श्राद्ध घालणं म्हणजे मूर्खपणाचं आहे. श्राद्ध घालून पैसे उधळण्यापेक्षा त्या पैशातून समाजहित होऊ शकते. जो मनुष्यदेह धारण करून भूतलावर जन्माला आला आहे. त्याला एक ना एक दिवस पृथ्वीचा निरोप घ्यावाच लागतो. मग मरणोत्तर श्राद्धाचा घाट नेमका कशासाठी घालायचा, असा प्रश्न तुकडोजी महाराज लोकांना विचारत म्हणतात की, श्राद्ध घालून एखाद्या व्यक्तीसाठी रडत बसणं हा मूर्खपणा आहे. कारण आपण एखाद्याला जगताना किंमत देत नाही पण त्यांच्या मृत्यूनंतर जणू आभाळचं कोसळलं आहे, असं सोंग कसं आणू शकतो आणि जगताना रोटी दिली नाही मग मरणानंतर तुपाची वाटी का दाखवता, असा सवालही तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये लिहायला विसरले नाहीत. खरं तर मृत्यूसारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही, असं ते एका ठिकाणी म्हणतात. कारण मनुष्य जन्म फक्त दु:ख भोगण्यासाठीच झाला आहे आणि हेच सत्य आहे, असं तुकाराम महाराज एका अभंगात स्पष्टपणे सांगतात.
। दु:खासी कारण जन्म घ्यावा।
संत तुकडोजी महाराज आपल्याला जाणीव करून देतात की, तुम्हा सर्वाचा जन्म कधी ना कधी मरण येण्यासाठीच झाला आहे. महाराज एके ठिकाणी म्हणतात की, मरणोत्तर विधीचे स्तोम करू नका. यामुळे मरणा-यालाही सद्गती मिळत नाही आणि जीवंत असलेल्या व्यक्तीला जीवंतपणी यातना होतात.
। तैसेचि मृत्यूसंस्काराचे। स्तोम नसावे अंत्यविधीचे।
। जेणे मृताचिंया नावे सजीवाचे। दुखी होय जीवन।

वरील रचनेतून अतिशय सुलभतेने तुकडोजी अंत्यसंस्काराचं स्तोम माजवू नका, असं सांगतात. पण आज समाजात याउलट घडताना दिसत आहे. मृत्यूआधी लोकांना हीन वागणूक दिली जाते आणि मरणानंतर श्रद्धापूर्वक विधी केले जातात. खरंतर हे सगळं करण्याची गरजच नाही कारण मृत्यूआधी माणसाला खायलाही दिलं जातं नाही, पण मृत्यूनंतर कावळ्याला त्या व्यक्तीचं प्रतीक मानून तूप-रोटी आणि दही-भाताचे उंडे करून घातले जातात. खरंतर हे सगळं मृत्यू आधी केलं तर अशीच उगाचच थोतांडरूपी श्रद्धा पाळण्याची काही गरज नाही, असे महाराज एकेठिकाणी स्पष्ट सांगतात.
। तुपावाचोनि नको भोजन।
हे शास्त्रवचन पाळितो कोण।
। मग मृतासीच तुप चोळाया जाण।

 

शास्त्रवचन का सांगावे।
महाराज असंही म्हणतात की, एखाद्याचा मृत्यू झाल्यावर दहा दिवस उपवास करण्यापेक्षा, कामावर न जाऊन पोटाला चिमटे घेण्यापेक्षा ही पद्धत मोडीत काढली पाहिजे. एखाद्या गरिबांच्या घरी एखादी व्यक्ती मृत पावली तर त्या व्यक्तीनं कामावर न जाता दहा दिवस उदरनिर्वाह कसा करायचा? ज्या व्यक्तीचं हातावर पोट आहे, त्याने या मृत्यूपश्चात केल्या जाणा-या संस्काराला बळी पडूच नये.
। मृत्यू झाला एकाचिया घरी।
खावयास नाही एक दिवस ज्वारी ।
। सुतक धरोनि कैसियापरी। बसावे तेणे।
। एक दिवस खाली गेला। तरी उपास पडती गरीबाला।
। त्याने दहा दिवस उपास भला।
कैसा करावा सांगा तुम्ही।

महाराज या श्राद्ध विधीला या ठिकाणी पूर्णपणे विरोध करतात आणि लोकांना सांगतात की, अशा थोतांडाला बळी पडू नका. आपण एक दिवस जर काम केलं नाही तर आपल्याला अन्न-पाणी मिळणार नाही. मग उगाचच मृत्यूच्या आठवणीचा बहाणा करत का उपाशी राहायचं, असं केल्याने काही साध्य होत नाही.
संत तुकडोजी महाराज एके ठिकाणी हे अंत्यसंस्कार का करायचे, याचे डोळसपणे निरीक्षण करून या दहा दिवसांचे आणि श्राद्धाचं वर्णन करतात, बाबांनो हे दहा दिवस म्हणजे उपवास वगैरे करण्यासाठी नसून या दहा दिवसांत मृत व्यक्तीचा संसर्ग कुटुंबाला होऊ नये, म्हणून हे तेरा दिवस चूल पेटवायची नसते. गोमूत्राचा सडा, कडुनिंबाची पानं खाणं, एकमेकांला हात न लावणं हे सगळं आरोग्यासाठी आहे. श्रद्धा किंवा अंधश्रद्धा, हा विषय यात नाहीच.
मग उगाचच अंधश्रद्धेला बळी का पडायचे? ‘सुतक’ या शब्दांचा अर्थच लोकांना कळालेला नाही, असं महाराज या ठिकाणी म्हणतात. कारण सुतकाचा बहाणा करून उगाचच मृताच्या नावाने टाहो फोडण्यात काय अर्थ आणि उगाचच वगैरे घालण्यात काय अर्थ.. महाराज या ठिकाणी ‘सुतका’चा अर्थ स्पष्टपणे सांगतात.
। गोमूत्र शिंपडणे निंब खाणे। प्रेतासी अग्निसंस्कार देणे।
। सुतक अस्पर्शता पाळणे। आरोग्यासाठी सर्व हे।
। म्हणोनि शुद्ध जलाने स्नान करावे।
शुद्ध कपडे परिधान करावे।
। असेल ते वस्त्रपात्र धुवावे। रोगियाचे।
। हे करणे आवश्यक। याचीस बोलती सुतक।
। परि दहा दिवस करावा शोक। हे तो मना पटेना।

संत तुकडोजी महाराज म्हणतात की, अरे श्राद्ध घालून पैसे उधळण्यापेक्षा आपण एकमेकांशी चांगलं वागू, असा संकल्प सोडावा. आपली परिस्थिती नसतानादेखील श्राद्ध घालून ब्राह्मणांची पोटं भरण्यापेक्षा जिवंतपणीच चांगला वागण्याचा प्रयत्न करावा आणि तेराव्या दिवशी पैसा असेल तर दानधर्म करावा, नसेल तर मनात खेद मानू नये. भजनांचा आनंद घ्यावा. उगाचच श्राद्ध प्रथेचे थोतांड नको.
। विवेके सावरोनि भावना। करावी तेराव्या दिवशी प्रार्थना।
। सर्व लोकांसह जाणा। भजनानंद चाखावा।
। असेल तरी दान देवोनि। सेवा करी त्या निमित्तानी।
नसल्यास मनी खेद नको।
। मोकळेपणाने नमन करावे। मी उत्तम वागेन संकल्पावे।
। सेवेचे कार्य चालवावे। गतात्म्याच्या प्रित्यर्थ।

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एके ठिकाणी स्पष्टपणे म्हणतात की, जिवंतपणी आपली फजिती करून दिवाळे काढण्यापेक्षा, रूढी, परंपरा म्हणून श्राद्धाच्या नावाने कर्ज काढणा-या आणि आपल्या जातभाईंना जेवण घालणा-या आणि ब्राह्मणांचा भरुदड सहन करणा-या, त्यांना गोडधोड जेवण घालणा-या या परंपरेमुळे गरिबांचे हाल होतात. ते श्रद्धेच्या नावाखाली गोरगरीब कर्जबाजारी होतात. श्राद्धानंतर त्यांच्यावर ‘अन्न-अन्न’ करण्याची वेळ येते.
। जित्यांची होऊ नये फजिती।
कोणी दान दक्षिणेत दिवाळे काढती। ऐसे नको।
। कोणी रूढी बंधनात पडती। मृतांसाठी कर्ज काढती।
। त्यांच्या नावाने पंगती उठविती। जातभाई जमवोनि।
। बुवा पंच अथवा ब्राह्मण।
यासी धन देती भरुदड म्हणोन ।
। कोणी घेती गोडजेवण। कमर मोडी गरीबांची।

 
स्वर्ग-नरकाच्या गोष्टी
संत तुकडोजी महाराज म्हणतात की, स्वर्ग-नरकाचा सारा खेळ भूतलावर आहे. त्यात पिंडदान केल्यानेच स्वर्ग प्राप्त होतो असे नाही. जिवंतपणीच आपण आपल्यासाठी स्वर्ग नरकाचा मार्ग करत असतो. महाराज एकेठिकाणी सांगतात की, जो प्राणी त्यांचे कार्य चोख करतो तोच कीर्तीरूपी स्मरणात राहतो आणि जो कसलेच कार्य करत नाही त्यांची आठवण कशी राहणार आपल्या मराठी भाषेत. एक म्हण आहे,
। जन्माला आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला।
वरील म्हणीतून काम केलेच नाहीतर एखाद्या हेल्यासारखी (रेडय़ासारखी) अवस्था मनुष्यप्राण्याची झाल्याशिवाय राहत नाही. खरंतर एका म्हणीत असं ही म्हटलं आहे की, ‘मरावे परी कीर्ती रूपी उरावे..’ म्हणजेच मनुष्याने प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि यालाच महाराज स्वर्ग-नरकाची उपमा देतात. मृत्यूनंतर दहा दिवस आत्मा भ्रमण करतो आणि पिंडदान आणि श्राद्धाचे विधी केल्यानंतरच त्याला स्वर्ग भेटतो, जर हा विधी केला नाही, तर तो नरकात जातो, हे म्हणणे चुकीचे आहे. स्वर्ग-नरकाची कल्पना अस्तित्वात आहे? हे काहीच नाही कर्मावर निर्भर असतं की, आपण स्वर्गात जाणार की नरकात.. खरंतर ब्राह्मणाचं पोट भरावं, यासाठी त्यांनीच या खोटय़ा कल्पनेचा त्यांच्या स्वार्थासाठी उपयोग केला आहे.
तुकडोजी महाराज म्हणतात की, पिंडाला असं काहीच महत्त्व नाही महत्त्वाचं हे आहे की, मनुष्य जन्माला येऊ न त्यांनी काय कर्म केले. कारण काही जणांना देह मिळतो पण त्यांचा वापर करता येत नाही. पण काही जणांना तो देह मिळत नाही, म्हणून काही लोक भगवंताकडे प्रार्थना करतात. स्वर्गातले देव ही मनुष्य देह मिळावा यासाठी देवाला मागणे मागतात. ते संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून लोकांना सांगतात
। स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा।
मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हां।

यावर भगवंत म्हणतात, मृत्यूलोकी जाऊन तुम्ही काय करणार, त्यांच ही उत्तर ते अशाप्रकारे देतात.
। नारायण नामे होऊ जीवनमुक्त।
कीर्तने अनंत गाऊ गीते।

म्हणजेच स्वर्गीचे अमर देव म्हणतात की, हे भगवंता आम्ही मृत्यूलोकी जाऊन मनुष्य जन्माचे सार्थक करू नारायण नामाचा गजर करू आणि कीर्तन भजनात आनंदाने नाचू आणि पापमुक्त होऊ. म्हणून आम्हाला मनुष्य जन्म द्यावा.
याच अभंगाचा आढावा घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की, मनुष्य जन्माचं ज्यानं सार्थक केलं आहे आणि ज्यानं आपलं कर्म कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं आहे, अशांनाच स्वर्ग नावाच्या कल्पनाविश्वात प्रवेश मिळतो.
। कीर्ती तोचि स्वर्ग खरा। अपकिर्ती नरकाचा पसारा।
। याची जगी याचा व्याप सारा। पाहती प्राणी।
। म्हणोनि कार्यातिच स्वर्गनर्क।
सकाम ग्रंथाचे फोल कौतुक।
। मिथ्यां कल्पनांत भुलले लोक। स्वार्थीयांच्या।
। म्हणती कावळ्याने पिंड नेला।
तरीच तो स्वर्गाला गेला।
। पिंडाचे नाही महत्त्व येथे।
महत्त्वाचे असे काय केले ते। जन्मा येवोनि मानवाच्या।
। मेल्यावरी दहा दिवस भ्रमतो।
जीव पिंडी देता स्वर्गी जातो।
। नाही तरी नर्की पडतो। ऐसे म्हणणे व्यर्थ असे।

महाराज एकेठिकाणी म्हणतात, माणसाचं कर्म पिंड बदलू शकत नाही मग स्वर्गानरकासाठी श्राद्धाचा खटाटोप का करावा. जर मनुष्याने चांगले कर्म केले असेल तर त्याला उत्तम धाम मिळते नाहीतर पुन्हा त्याच योनीत दुखभोगण्यासाठी यावे लागते. ज्यांने कर्मच चांगले केले नाही आणि कावळ्यांना जरी हजार वेळा पिंड उचलले तरी त्याला उन्नत गती लाभणार नाही .
। त्यांने केले असेल उत्तम कर्म।
तरीच पावेल उत्तम धाम।
। नाहीतर पुन्हा अधम। योनीत जाणे स्वाभाविक।
। ज्याने सुकृतचि नाही केले।
त्याचे कितीही पिंड उचलले।
। म्हणोनि काय उन्नत झाले। जीवन त्याचे।
कबीर महाराजांचे श्राद्धाविषयीचं मत
कबीर महाराजांनी संत साहित्यात केलेल्या रचना अजरामर आहेत. धन, दौलत, प्रतिष्ठा, भगवंत यांच्याविषयी हिंदीतून लिहिणारा हा पहिलाच भक्तकवी म्हणावा लागेल. कबिरांचा प्रत्येक अभंग जितका मार्मिक असतो, तितकाच भावार्थ ही त्यात दडलेला असतो. कबीर महाराज लोकांना एकेठिकाणी सांगताना म्हणतात की, लोकहो, तुम्हाला काय वाटतं तुमचा राम, रहीम, नानक कुठे आहे? स्वर्गा-नरकाच्या न झेपणा-या गोष्टी का करता? बाबांनो, जरासा विचार पाप-पुण्याच्या लेखाजोख्यातच राम, रहीम आहे. भूतलावार कोठेच स्वर्ग-नरक नाही. आकाशगंगेत ही कोठेच स्वर्ग नाही. ग्रंथाच्या कल्पनेतून चांगलं काम करणाऱ्यांना स्वर्ग प्राप्ती होते असा समज आहे. खरंतर स्वर्ग नर्क नाही मग श्राद्धाचा अट्टाहास कशाला? त्याच अर्थाचा दोहा कबीर महाराज येथे लिहितात.
। पापपून दोऊ जनमसंगाती। और चले न कोई।।
कबीर महाराज म्हणतात की, पाप-पुण्य हेच मनुष्य जन्माचे साथीदार आहेत. जन्म घेताना आणि मृत्यूला सामोरी जाताना फक्त पाप पुण्य मनुष्यासोबत असतं मग कर्मच चांगले केलं पाहिजे आणि ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे.
।। वहाँ न दोजख, बहिस्त मुकामा।
यहाँही राम, यहॉँही रहमाना।।

महाराज म्हणतात की, मृत्यूनंतर स्वर्ग-नरकाचा हिशोब राहतच नाही कारण या कल्पना आहेत. कल्पना कधी ख-या नसतात, जे काही आहे ते भूतलावर येथेच राम आहे आणि येथेच रहीम देखील आहे. मग उगाचच श्राद्धाच्या कल्पनेला प्रोत्साहन का द्यायचे.
संत नामदेव महाराज एके ठिकाणी म्हणतात की, आपण सगळे एकत्र येऊन नाचूया, हरिनाम घेऊया यामुळे कळीकाळ यमाला घाम फुटेल आणि तो नरकाकडे आपल्याला नेणार नाही.
। यारे नाचू प्रेमानंदे। विठ्ठल नामाचीया छंदे।
। जाऊ म्हणती पंढरी वाटे। कळी काळा भय दाटे।

जन्माला येऊन मनोभावे भक्ती करता नाही आली तरी चालेल. पण जन्मदात्या आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. उगाचच त्यांच्या मरणोत्तर श्राद्ध घालून काय प्राप्त होणार असे संत महात्मे म्हणून गेले.
। काशी, गया, वाराणसी।
सारे आई-वडिलांच्या चरणापाशी।

Avatar
About अमोल उंबरकर 6 Articles
"मी अमोल उंबरकर,पत्रकारिता विषयातून पदवीधर आहे. सध्या मी प्रहार या प्रसिद्ध वृत्तपत्रात उप-संपादक म्हणून श्रद्धा संस्कृती या सदरासाठी लेखन करतो. आजवर 3000 कविता लिहल्या असून वेळोवेळी विविध मंचाद्वारे काव्य रसिकांची सेवा केली आहे. अनेक कथा आणि काही लघुपटासाठी लेखन केले आहे. वाचकांना भावविश्वात रमवण्यासाठी अनेक गझल आणि गाणी तयार केली आहेत.प्रेमकथा,बोधकथा असे विविध लिखाण मी करत असतो. संस्कृतीविषयक लेख आणि त्याचा अभ्यास करणे मला आवडते. कविता आणि लेख लिहणे माझा उपजत छंद आहे."

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..