नवीन लेखन...

दीनबंधू दिनकर

पेशानं डॉक्टर असूनही सरळ साधे जीवन जगणारा आणि गोर-गरीबांविषयी, समाज रचनेंत तळाशी असलेल्या बहुजनांविषयी आंतरिक तळमळ असणार्‍या व्यक्ती आजकालच्या व्यवहारी जमान्यांत विरळच ! समाजाची बांधिलकी, समाजाचे रक्षण अशा बोजड शब्दांचा जरासाही आधार न घेतां जनसामान्यांची निरागस सेवा करणारा आणि त्यांच्या भल्यासाठी – हातचे न राखता – सतत झिजणारा “साधा माणूस” !! दीनांचा कैवारी – दीनबंधू दिनकर !!!

डॉ. दिनकर लक्ष्मण बडकस मुळचे नागपुरचे. काका प्रथितयश न्यायाधीश. नावाजलेले न्यायमूर्ती बडकस महाराष्ट्र शासनाचा “बडकस आयोग” त्यानींच साकारला. असे जरी असले तरी दिनकरांच्या घरची स्थिती विपरीत. पितृछत्र लहानपणीच विरले. पाच मुलांचा सांभाळ त्यांच्या मातेकडून धड होण्याजोगी परिस्थिती नव्हती. अंगावरची सदरा-चडडी आणि पाठीवर दुसरी जोडी, दुसर्‍या दिवसासाठी! अशा अवस्तथेत, नशीब आजमावण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईत जसे परप्रांतीय येतात तशी. योगायोगाने त्यांचे एक नातेवाईक डॉ. बांडखे हे मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते. त्या तत्वशील माणसांन या ———— दिनूला नगरपालिकेच्या दवाखान्यांत कंपाऊंडरच्या जागेवर ठेऊन घेतले.

हाती आलेल्या संधीचं सोनं करण्याची किमया दिनूच्या अंगी होती. कुणाशीही जमवुन घेण, जमेल त्याला तशी मदत करण्याचा त्यांचा मनमिळाऊ स्वभाव तसेंच अविरत अथक कष्ट उपसण्याची तयारी या अंगभूत गुणांमुळे हा हा म्हणता मोठा लोकसंग्रह केला – अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत. गंमत अशी की लग्नासाठी त्यांना मुलगी देण्यास त्यांच्या व्यवसायामुळे कधी कधी अडचणी आल्या पण ——- जोशी सरांची सुकन्या सुशिला त्यांच्या मागे सुशील म्हणून छायेप्रमाणे उभी राहिली आणि ती “छाया” आजपर्यंत त्यांच्यामागे खंबीरपणे उभी ठाकली आहे. तोच त्यांचा मानसिक आधार.

पंधरा वर्षांच्या सेवेनंतर R.M.P CERTIFICATE / DEGREE मिळवली. नगर पालिकेच्या सेवेंत राहुन १९६२ पासून स्वतंत्र व्यवसायास सुरुवात केली. व्यवसाय क्षेत्र होते : कापुरबावडी-बाळकुम. दिनकर दिवसभर महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांची /वरिष्ठांची मनापासून सेवा करी. संध्याकाळी घाटकोपर ते बाळकुम तिथं ७ ते ११ पर्यंत ग्रामस्थांची सेवा. सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ लोटला, पण सेवेत कधी खंड पडला नाही. निवृत्ती नंतरही वयाच्या अमृतमयी वर्षापर्यंत उत्साह दुथडी भरुन वाहत होता.

कुणाकडे पैसे कधी मागितले नाहीत, असलेत तर द्या नाहीतर नंतर बघू ! या त्यांच्या उदार स्वभावांन त्यांनी बाळकुम-कापुबावडी आपलेसे केले. रात्री-अपरात्री स्वत: जाऊन जातीनं विचारपूस करावी. औषध आणि धीर द्यावा. प्रसंगी स्वत:कडे असलेली औषधे द्यावीत, कसलीही अपेक्षा न ठेवता. कुठलीही बांधिलकी नसतांना बहुजन समाज मनाला प्रेमाच्या धाग्यानं बांधून ठेवण्याची किमया एकटा दिनूच करु जाणे. निरागस सेवा म्हणतात ती हीच! मानवतेची पूजा बांधणार्‍यांचीच ही किमया !! पेशंट हाच परमेश्वर!!!

अज्ञा फिकिरी वृत्तीवर सारेचजण डॉ. दिनकरांवर फिदा. जयांच्याकडे पैसे नव्हते, त्या घरांतून डॉक्टरांच्या घरी पापड, कुरडया, शेवया, गहू, तांदूळ, आणि नाही नाही ते पदार्थ शेतमाल येऊन पडत असे, दिनुच्या ते गांवी हे नसे ! बाळकुम-कापुरबावडी मधल्या कोणत्याही छोट्या वा मोठ्या व्यक्तीच्या घरी समारंभास दिनू दादांना हमखास आमंत्रण, अन् ते ही अगदी हळदीपासून !! चिकन बनवणे हा त्यांचा छंद केंटुकी चिकन इतकेच सरस पण झणझणीत. ते बनवून इतरांना आग्रहाने खाऊ घालताना दिनू दादा जास्त प्रसन्न दिसतात. कापुरबावडीच्या अमिनाबाईचे पुसपुशीत चिकन महिन्यांतून ती ते चार वेळा त्यांच्या घरी असायचे.

गोतावळा, गणगोत विस्तारलेले त्यामुळे वरचेवर लग्न-मुंजी आधि समारंभ होत असत. दिनकर दादांची हजेरी अनिवार्य, नव्हे पाहिजेच ! पाहिजेच ! पण दादा येतीलच याची खात्री नसे. पेशंटचे बोलावणे त्यांना लग्नकार्यापेक्षा जास्त मोलाचे होते. दादा मनानं हळवे लोकसेवा हीच त्यांना समारंभाचा आनंद देऊन जाई. आपले मात्र तसे नसते, म्हणूनच सर्वार्थानं ते आमचे “दादा” आहेत!
नाशहिकची एक आठवण : लग्नकार्यात मग्न असतांना त्यांना कुणाचातरी निरोप मिळाला. कुणीतरी नात्यांतलं आजारी आहे, हे त्यांना कळले मात्र त्यांनी न जेवतां कार्य सोडून मुंबईस प्रयाण केले. असे प्रसंग, या सेवाभावी माणसाच्या आयुष्यांत वरचेवर येत असत. ते खर्‍या अर्थानं “अर्थपूर्ण” जीवन जगत होते, जगत आहेत. कुणीतरी आप्त स्वकीय, परिचित आजारी म्हटला की, दादा सर्व प्रथम तेथे हजर! पैशाची, मानधनाची, मानाची अपेक्षा मुळीच नाही. निखळ साधेपणा, हीच साधना नि ईश्वर सेवा !!

अतीव साधेपणानं आणि आपुलकीच्या वागण्यानं दादांनी प्रत्येक शाखेतले उत्तमोत्तम डॉक्टर्स स्ने– जोडून ठेवले. डॉ. मुळेकर, डॉ. व्हि.बी. आठवले, डॉ. व्यास, डॉ. वर्तक आणि अनेकानेक, यादी खूप मोठी. ही सारी त्यांच्या घरची माणसं. मला एक प्रसंग आठवतो. एकदा ते स्वत: आजारी होते. घाटकोपरच्या हिंदुमहासभा रुग्णालयात त्यांना ठेवले होते. त्यांना भेटण्यासाठी मी सप्तनिक गेलो. दादा त्यांच्या बेडवर नव्हते. इकडे तिकडे चौकशी केली. दादा वेगळ्या वार्डात. दादा दुसर्‍या एका पेशंटला तपासतांना आढळले! जरा बरे वाटल्यावर इतरांच्या प्रकृतीची चौकशी. असे व्यक्तिमत्व विरळच. धन्य ते दिनकर .

स्वत:च्या मधुमेहाला सुमारे पन्नास वर्षे ते सांभाळून आहेत, सवत:ची प्रकृती सांभाळून, इतरांना हळूवारपणे सक्रीय आधार देणारा, प्रसंगी स्वत:च्या प्रकृतीची तमा न बाळगणारा दानशूर कर्ण दिनकरा सारखा विराळाच! नुकतीच वयाची अठ्ठ्यातरी ओलांडली. स्वत:पेक्षा इतरेजनांची काळजी वाहणार्‍या या दिनू दादांची दैदिप्यमान कारकीर्द शतायुषी व्हावी हीच या क्षणी गुरुमाऊली चरनी विनम्र विनवणी, हीच एक प्रार्थना !!
०७-१०-२००९
मुलुंड (पूर्व)

शब्दांकन : सुरेश नाईक, मुंबई ४०००८१

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..