नवीन लेखन...

सौंदर्य प्रसाधने आणि आरोग्य

फॅशनची व्याख्या बदलू शकते पण आरोग्याची व्याख्या मात्र बदलत नसते. बदलून चालतही नाही श्रीमती पिंटो नावाच्या एक महिला एक दिवस माझ्याकडे आल्या. त्यांची तक्रार जरा वेगळीच आणि काहीशी गमतीशीर होती !श्रीमती पिंटोच्या चेहऱ्यावर गेली दोन वर्षे पुटकुळ्या उठत होत्या पण पुटकुळ्यांची पद्धत अशी की त्या शनिवार-रविवारी अगदी फुलून येत आणि नंतर आपोआप हळूहळू मावळून जात ! गुरुवार शुक्रवारपर्यंत चेहरा स्वच्छ होऊन जाई. नंतर पुन्हा शनिवारी चेहरा भरून जाई.

पिंटो अगदी वैतागून गेल्या होत्या. त्यांनी दोन वर्षात अनेक उपचार करून पाह्यले. तपासण्या, क्रीम, घरगुती औषधे सगळं झालं पण शनिवार-रविवार पुटकुळ्या चेहऱ्यावर आपल्या हजर ! त्यांना तपासले खरं, पण मलाही काय करावं प्रथम समजेच ना ! त्यांनी ठरवून टाकलं होतं, आता हा शेवटचाच उपाय. यापुढे उपचार बंद. त्यांचा निर्णय कळल्यामुळं माझीही जबाबदारि वाढली होती. मी पहिल्या प्रथम माझा सुरुवातीचा उपचार केला आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियाबद्दल विचारलं.

त्यांचे पती मुंबईला एका बड्या आंतराष्ट्रीय कंपनीत एक्झिक्युटिव्ह होते. ते पुण्याला शनिवार-रविवारी यायचे. दोन दिवस कुटुंबात राहून सोमवारी परत मुंबईला जायचे.मिस्टर पिंटो पुण्याला आले की त्यांना भेटायला घेऊन येण्याबद्दल मी मिसेस पिंटोना सांगितलं. नंतरच्या शनिवारी पतिपत्नी दोघं कन्सल्टिंरुममध्ये आले. ते आत येताच इंपोर्टेड सेंटचा मंद सुवास रुममध्ये पसरला. ती दोघं बसली. पिटोंच्या अंगावरचा वास मला अस्वस्थ करू लागला. वास आवडला नाही म्हणून नाही; तर हा सेंटच मिसेस पिंटोच्या पुटकुळ्यांना कारणीभूत असेल काय असा विचार मनात आला म्हणून !
मिस्टर पिंटोंना या आफ्टर शेव्हलोशनची खूप आवड. ते शानिवार-रविवार पुण्याला आले की साहजिकच ते इथंही दाढी केल्यावर हे लोशन वापरीत असणार !

दोन दिवस पत्नीच्या सहवासात काढून ते सोमवारी जात. म्हणजे त्यानंतर शनिवारपर्यंत मिसेस पिंटो एकट्याच.मिस्टर पिंटोंना मी सांगितलं की तुम्ही पुण्याला पुन्हा आलात की दोन दिवस हे आफ्टर शेव्ह लोशन वापरू नका.त्यांनी तसं केलं. दोनच दिवसांनी मिसेस पिंटो आनंदी चेहेऱ्यानं आल्या आणि सांगू लागल्या, ‘ हा शनिवार-रविवार पुटकुळ्या आल्या नाहीत !

अशा तऱ्हेच्या कितीतरी केसेस सांगता येतील. लोशन, क्रीम यासारख्या सौंदर्यप्रसाधनांमुळे कितीतरी स्त्रीपुरुषांना त्रास भोगावा लागत असतो. पण ते जागरूक राहत नाहीत.सध्याच्या दिवसांत सौंदर्यप्रसाधं आणि फॅशनच्या बाबतीत प्रत्येकानं विशेषतः महिलांनी त्यांची निवड करताना अत्यंत सावधगिरी बाळगायला हवी. खरं म्हणजे प्रसाधनं ही सौंदर्यवृद्धीसाठी तयार केली असतात. पण जर कोणी त्यांचे दुष्पपरिणाम काय होतात हे जर लक्षात घेतलं नाही, तर सौंदर्याऐवजी त्या प्रसाधनांपासून त्रासच होईल.

नेहमी वापरली जाणारी सौंदर्यप्रसाधनं खाली उल्लेख केलेली प्रसाधनं नेहमी वापरलं जातात आणि त्यांच्यापासून अपायही होण्याची शक्यता असते.

(१) हेअर डाईज :
आकर्षक आणि तरुण दिसण्यासाठी कलप वापरणारी कितीतरी माणसं असतात. या कलपांमध्ये फेनिल-अलानाईन-डायमाईन नावाचं द्रव्य वापरलं जातं. बऱ्याच पेशंटच्या बाबतीत ते सैतानी उपद्र्व देणारं असते ! असे कलप वापरल्यानं चेहेरा सुजणं, लाल होणं, तसंच टाळू, चेहेरा आणि डोळ्यांची आग होणं अशा व्याधी सूरू होताट. दीर्घ काळापर्यंत हे कलप वापरल्यामुळ या व्याधी व्यक्तीला कायमच्या चिकटतात.
कलप वापरल्यानं त्वचेचा कॅन्सर झाल्याचीही उदाहरणं आहेत. मेंदी हा नैसर्गिक कलप असून अत्यंत कमी धोकादायक आहे.

(२) शांपू :
अनेक सुगंधी शांपूच्या सतत वापरानं डोक्याच्या त्वचेला गंभीर स्वरूपाचे अपाय होऊ शकतात. तसंच शांपूमुळे केसांची चमकही नाहीशी होत जाते. आणि केस गळायला लागतात.

(३) साबण :
बहुतेक सर्व साबणांमध्ये कॉस्टिक सोडा वापरलेले असते. विशेषतः औषधी साबणांमध्ये जंतू प्रतिबंधक द्रव्ये वापरलेली असतात. या द्रव्यांमुळे त्वचेला कोरडेपणा येतो. त्यातून पुढं त्वचेचे विविध विकार उद्भवू शकतात.

(४) केसांचे सुगंधी तेल :
जर कुणाला सुगंधी द्रव्यांची ऍलर्जी असेल, तर त्यांनी सुगंधी तेल न वापरणंच इष्ट असतं. कित्येकांना अशी तेलं वापरल्यानं डोक जड होणं, दुखणं, अशी दुखणी सुरू होतात. आयुर्वेदिक साबण व सौम्य तेलं विशेषतः खोबरेल तेल वापरणं हितकारक असतं.

(५) कुंकू :
ज्या रंगाची साडी त्याच रंगाची कुंकवाची टिकली कपाळावर हवीच, अशी हल्लीची फॅशन आहे. निरनिरळ्या रंगाची कुमकुम हल्ली बाजारात मिळतात. त्यात अनिलाईन डाईन आणि मधमाशांचं मेण वापरलेले असते. अशा कुंकवांच्या वापरामुळे आगपेणं आणि कोडसुद्धा होऊ शकतं.

(६) मस्कारा व आय शॅडोज :
या प्रसाधनांमध्ये विविध धातूंचा उपयोग केला जात असल्यामुळं त्वचेचा रंग कायमचा बदलू शकतो. डागही पडू शकतात.

(७) लिपस्टिक :
लिपस्टिकच्या वापरामुळं ओठ अत्यंत आकर्षक आणि आव्हानात्मक दिसतात. हे खरं असलं तरी काही जणींना यातील मेण आणि रंग अपायकारक ठरू शकतात.

(८) फेस पावडार क्रीम :
विविध प्रकारच्या फेस पावडरींमध्ये क्रीम्स आणि फाऊंडेशन्समध्ये असे काही पदार्थ वापरलेले असतात की त्यांची अनेकांना ऍलर्जी असते. त्यामुळं त्वचा लाल होते. आग करणारं पुरळ उमटतं तर कित्येकदा चेहऱ्यावर चट्टेही पडतात.

(९) जीवनसत्त्वांचा वापर :
आपली प्रकृती तंदुरुस्त ठेवण्यासाठी जीवनसत्त्वयुक्त औषधांचा तात्पुरता वापर केला केला तर त्वचा ठीक राहतेही पण सततच्या वापरामुळं त्वचा कधीही दुरुस्त होऊ शकणार नाही इतकी खराब होऊ शकते.

(१०) ब्लिचिंग एजंटस :
आपल्या त्वचेच्या काळ्या, सावळ्या रंगावर नाराज होऊन बऱ्याच स्त्रिया ‘ब्लिचिंग’ करून गोरे बनण्याचा अट्टाहास करतात. पण या खाळ्या सावळ्या रंगातही सौंदर्य असतं, तेज असतं याची कल्पना स्त्रियांना नसते. या ब्लिचिंग एजंटसमध्ये अमोनियाकरण केलेला पारा वापरलेला असतो. त्याच्यामुळं त्वचेला अपायच होत असतो.

(११) नेल पॉलिश :
सर्वसामान्यपणे नेलपॉलिशमध्ये ‘ फॉर्मलडिहाईड लिकर ” या द्र्वाचा वापर केलेला असतो. त्यामुळं ‘ पैरानोसिया ’ म्हणजे नखांचा विकार होऊ शकतो. आणि काहीजणींना तर नखापासून दूर असलेल्या ठिकाणी म्हणजे पापण्याजवळ इसब वगैरेसारखे विकार होऊ शकतात.
हे सर्व वाचल्यावर कुणी घाबरून गेल्यास नवल नाही. पण या बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रत्येकीला प्रत्येक सौंदर्य प्रसाधनाची ऍलर्जी असलेच असं नाही. प्रत्येकीच्या त्वचेची संवेदनक्षमता वेगवेगळी असते. सौंदर्यप्रसाधनं वापरण्यापूर्वीच नीट दक्षता घेतली गेली तर त्याचा त्रास होण्याचा संभव कमी होतो.

नेहमी वापरात असलेले ब्रँड एकदम बदलून दुसरे सुरू करू नयेत. जर नवीन प्रकार वापरायला सुरुवात केल्यावर त्वचेवर काही अनपेक्षित चमत्कारिक बदल दिसले तर लगेच त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि तो प्रकार वापरणं बंद करावं.किंमत जास्त असलेलं अगदी परदेशी प्रसाधनही एखादीला छळू शकतं. तेव्हा आणि अपाय यांचा काहीही संबंध नाही. कधी कधी अगदी साधं मलमसुद्धा त्रासदायक ठरू शकतं. तेव्हा निसर्ग आणि नैसर्गिक उपचार हेच खरं. पाण्यानं स्वच्छ धुतलेला चेहरा नेहमीच टवटवीत दिसत नाही का ? तेव्हा आपल्याचं सौंदर्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रसाधनांचा उपयोग न केलेलाच बरा.

आरोग्यम् धनसंपदा

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..