नवीन लेखन...

प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २४

“दूध आणि दही सुद्धा डायबेटीस मधे चालत नाही म्हणजे काय ?”
“आहो, आम्ही आमच्या लहानपणापासून ऐकतोय दूध पूर्णान्न आहे म्हणून.त्याचं काय ?”

कच्च्या मालापेक्षा पक्का माल विकावा.त्यात जास्ती फायदा असतो. हे आजचे व्यापारशास्त्र पण सांगते. कृष्णाने सुद्धा द्वापारयुगात तेच केले होते. कृतीतही आणले होते. गोकुळातून दूध आणि दह्याची मडकी मथुरेत, कंसाच्या राज्यात जात होती. दूध आणि दही खाण्यापेक्षा त्यापासून बनणारे ताक, लोणी आणि तूप हे उत्तरोत्तर अधिक सुपाच्य, पौष्टिक आणि जास्त चलन मिळवून देणारे अमृत असे सहजपणे शत्रुला द्यायचे ? म्हणून तर कृष्णाने मथुरेत जाणारी दुधदह्याची मडकी फोडून टाकून, डेऱ्यातील ताक, लोणी तूप मात्र, चोरून का होईना, स्वदेशातच वाटून आपल्याच बांधवाना पुष्ट केले.

आणि असे ताकद वाढवणारे ताक, लोणी आणि तूप हे प्रमेहातही अपथ्यकर नाही. उलट ताक पचायला हलके, सदा पथ्यकर, अग्निला विझू न देणारे, आणि गुणाने रूक्ष आहे. तूप हे तर पित्ताला कमी करून अग्निला वाढवणारे एकमेव द्रव्य असावे.

आमच्या राज्यातील ताक लोणी आणि तुपाचं हे अमृत शत्रुपक्षाला विकण्यापेक्षा, दुधाची आणि दह्याची मडकी फोडून टाकणारा, प्रमेहाचे प्रतिकात्मक कारण नष्ट करणारा, भगवान श्रीकृष्ण आमचा आदर्श असला पाहिजे.

आयुर्वेदानुसार डायबेटीसला म्हणे गुळ चालतो. कोणीतरी, काहीतरी चर्चेसाठी पिल्लू सोडून देतो झालं. ग्रंथकार इतक्या स्पष्ट शब्दात गुळाचा उल्लेख, प्रमेह होण्याच्या कारणांमधे करीत आहेत, त्याला कसे नाकारायचे ? केवळ गुळच नव्हे तर गुळापासून बनलेले पुढील सर्व पदार्थ देखील अपथ्यकर सांगितले आहेत.

बरं आता जो गुळ बाजारात मिळतोय, तो फुल्ल ऑफ केमिकल. पिवळा आणि पांढरट रंगाचा गुळ हा चवीला खारटही लागतो, तो त्यातील घातक रसायनांमुळे. या रसायनांमुळे मधुमेह सोडाच, कॅन्सर सारखे जीवघेणे आजार पाठी लागताहेत. हे लक्षातच येत नाही. पूर्वी गुळाला मुंगळे यायचे, गुळाच्या ढेपीवर मधमाश्या फिरायच्या. आता त्यातील विषारी रसायनांमुळे किटकसुद्धा येईनासे झाले आहेत.

तसं गुळ पूर्वी च्या तुलनेत कमीच वापरला जातोय म्हणा ! पूर्वी कसं, बाहेरून कुणी पाहुणं आलं की गुळपाणी विचारलं जायचं. आता पाणीही विचारत नाहीत, गुळ तर लांबच राहीला. पूर्वी चहामधे पण गुळ वापरला जायचा. आता गुळाचे अतिशुद्ध विषारी रूप म्हणून साखर वापरली जातेय. !

गुळ अभिष्यंद उत्पन्न करणारा म्हणजे चिकटपणा करणारा आहे. शिवाय मधुररसाचा आहे. म्हणून प्रमेहामधे अपथ्यकर सांगितलेला आहे.

मधुर चवीपेक्षा, चिकटपणा जास्त गडबड करतो. आता हेच बघा ना.
आपल्या हातावर कोणीतरी साखर ठेवली. पटकन तोंडात टाकली. हात पुसुन मोकळे. हाताला साखर चिकटत नव्हती. पण हातावर साखर ठेवली. आणि हातातील साखरेवर अर्धा चमचाच पाणी घातले आणि सांगितले, “आता फक्त साखर खा” तर ????

साखर खाल्ल्यानंतर हाताला जसा चिकटपणा उरतो, तसाच चिकटपणा पोटातही तयार होतो, जो काढायला जास्ती कष्ट पडतात. अग्नि लवकर संपतो. आणि प्रमेहाची लक्षणे दिसतात. हा चिकटपणा जेवढा कमी होईल तेवढा प्रमेह लवकर नियंत्रणात येईल.

साखरेऐवजी वापरल्या जाणाऱ्या सॅक्रीनच्या गोळ्या, साखरेपेक्षा घातक ! अमेरिकेत कधीच बंद झाल्यात. अमेरिकेची अशी काही क्रेझ निर्माण झाली आहे ना, की उदाहरण देऊन पटवायचे झाले तरी अमेरीकाच आठवते. असो.

सॅक्रीनपेक्षा दोन चिमूट साखरच परवडली. साखरेपेक्षा थोडी कमी रसायने खडीसाखरेत असतात.

एकंदरीत प्रमेह हा भरपूर गैरसमजांनी भरलेला एक गोड आजार आहे, एवढे मात्र खरे !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.02.2017

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..