नवीन लेखन...

पेपरलेस कारभार – एक भ्रम

गेली काही वर्ष आपण पेपरलेसच्या गोष्टी ऐकतोय व त्याच्या गप्पाही मारतोय. संगणकीकरण, डिजीटलझेशन वैगेरेमुळे पेपर्स वापरण्याचं प्रमाण कमी होईल असं खरंच वाटत होतं. मलाही बरं वाटलं होतं. पर्यावरण, झाडं वैगेरे वाचतील हा विचार नंतरचा, पण ती कायतरी टायपलेल्या कागदांचं ओझं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं वाचेल म्हणून मला जास्त आनंद होत होता. पण परवाच एका वकिल मित्राकडे बसलो असता, तो संवाद कानावर पडला आणि मी भानावर आलो. मित्राकडे आलेला क्लायंट मित्राला, त्याच्या कागदपत्रांच्या किती प्रति काढू, असं विचारत होता आणि वकील साहेबांनी शांतपणे १५ प्रति काढा असं अगदी सहजतेने सांगीतलं. किमान दिडेकशे कागदांच्या प्रत्येकी पंधरा प्रती काढा म्हणणं मला विचार करायला भाग पाडू लागलं..

कंप्युटर, डिजीटायझेशनमुळे कागदी घोडे नाचवण थांबेल असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात होतंय उलटंच. कंप्युटर, प्रिंटर अगदी हाताशी आल्यापासून कागदाचा वापर आणि बेपर्वाई खुप प्रमाणात वाढली आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. काही काळापूर्वी हाताने लिहीताना खुप काळजी घेतली जायची. काही चुकल्यास पुन्हा सगळ लिहावं किंवा टाईप करायला लागायचं व ती मेहेनत टाळण्यासाठी पहिल्यापासूनच लक्ष देऊन काळजीपूर्वक लिहीलं जायचं. परंतू आता मात्र कंप्युटर टायपिंग झाल्यापासून टायपिंग सुबक व छान होतं मात्र त्यातील टायपोग्राफिक चुका सुरुवातीला तेवढ्याशा काळजीपूर्वक स्क्रीनवरच तपासल्या जात नाहीत. टाईप करून पहिला एक ड्राफ्टचा प्रिन्ट आऊट काढला जातो व मग तो तपासला जातो. त्यातील चुका स्क्रीनवर दुरुस्त करून, पुन्हा प्रिन्ट आऊट काढला जातो व त्यात बारीकशी जरी चुक आढळली तरी ती नंतर दुरुस्त करून पुन्हा फायनल प्रिन्टआऊट काढला जातो. त्यात लेटरहेडचे माप, मार्जिन वैगेरे गोष्टी तपासताना, फायनल ड्राफ्टच्या पुन: दोन-चार एकदम फायनल ढ्राफ्ट काडून मग पत्र फायनल केलं जातं. मग एकदाचं फायनल झालेलं पत्र प्रिन्टींगला सोडलं जातं आणि मग लक्षात येतं, की अऽऽर्रेरे, ते नेमकं लेटरहेडच्या मागच्या बाजूला छापलं गेलंय आणि मग आणखी एक ८० जीएसएमचा देखणा आणि महागडा कागद शहीद होऊन दुसरं लेटरहेड प्रिन्टरच्या मुखात सोडलं जातं. एक पानाचं एक पत्र टाईप करायचं असल्यास असे किमान सात-आठ कागद कचऱ्याच्या डब्यात टाकले जातात. अशी दहाएक पत्र तरी रोज एका आॅफिसात टाईप केली जात असतील, तर शंभर-एक तरी कागद विनाकारण वाया जात असतील. कंप्युटर-प्रिनटरचा हा फायदा की तोटा हे कळत नाही पण सोपं झालं की किंमत नाहीशी होते हे मात्र खरं..

आपण भले डिजीटायझेशनच्या गप्पा मारत असू, पण आपला ‘लेखी’ गोष्टींवर जास्त विश्वास असतो. त्या बाबतीत मात्र आपण कंप्युटरपूर्व युगातच आहोत. हातात कागद असल्याशिवाय आपला त्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. बरं नुसता ओरिजिनल कागद चालत नाही, तर तो हरवला तर काय, म्हणून त्याच्या चार-पाच झेराॅक्स प्रती काढून ठेवायच्या आणि एवढं करूनही आयत्यावेळी एकही प्रत सापडत नाही म्हणून पुन्हा मुळ कागदाच्या आणखी प्रति काढायच्या. झेराॅक्स अतिस्वस्त झाल्याचा हा परिणाम. सगळ्याच गोष्टी गरजेपेक्षा जास्त झाल्याचा हा परिणाम. इथंही कागदाचं वेस्टेजच.

कोर्टाएवढा कागदाचा अपव्यय इतर ठिकाणी बहुतेक होत नसावा. अर्थात याला शासन अपवाद, कारण ते चालतंच कागदी घोड्यांवर. कोर्टात कागदपत्रांच्या ज्या अमाप प्रती काढल्या जातात, त्या अशीलाचे आणि वादीचे वकील सोडले तर इतर पक्षकारांपैकी कुणी वाचत असेल का याची शंकाच आहे. तरीही नियम म्हणजे नियम, कागदं दिलीच पाहीजेत, मग ती फुकट गेली तरी चालतील. जे कागदावर असतं, ते आपण कंप्यटुरच्या किंवा स्मार्टफोनच्या स्क्रीनवरही सहज पाठवू शकतो, पाहू शकतो आणि गरज लागल्यासच प्रिन्ट आऊटही घेऊ शकतो. तरीही आपल्याला प्रिन्टेड कागदंच का द्यावी लागतात हे समजण्याच्या पलिकडचं आहे. कित्येक वकीलांच्या आॅफिसमधून असे उघडूनही न पाहीलेले गठ्ठे महिना अखेरीस रद्दीच्या दुकानात विकायला आलेले दिसतील. माणसं दिलेला शब्द पाळायला शिकली तरी देशातली सर्व कोर्ट्स दुसऱ्या दिवशीपासून बंद पडतील. मग पेपर तर सोडा, लाईट-पाणी आणि ज्युडिशिअरीवर होणारा खर्चही वाचेल. अर्थात हा माझा वेडा आशावाद आहे, तसं होणार नाही..!

असंच शासनात चालतं. बाजुच्या टेबलावर बसलेल्या बाबुकडेही लेखी कागद पाठवले जातात. कारण पुरावा म्हणून. त्यात काय लिहीलं आहे हे महत्वाचं नसतं, तर मी तुला ‘लेखी’ कळवलं हे कळण महत्वाचं असतं. विधानसभेचं अधिवेशन चालू असताना तर शासनाच्या अनेऽऽक महामंडळांचे अहवाल, अधिवेशनात विचारले जाणारे तारांकीत-अतारांकीत प्रश्न, शासकीय-अशासकीय ठराव व इतर अनेक कागदांच्या प्रती प्रत्येक आमदाराला देणं कायद्याने बंधनकारक असतं. काही ठराविक आमदार सोडले, तर बाकीचे हा कचरा उघडूनही बघत नाहीत हा माझा अनुभव आहे. अनेकांना तर त्या महामंडळांची नांवंही माहित नसतात, तरी अशा एखाद्याला एखादी प्रत मिळाली नाही, तर तो आमदार सभागृहात बोंबाबोंब करतो. कुणी जर ते उघडूनच बघणार नसेल, तर द्यायचंच कशाला मुळात. सर्वांच्या मोबाईलवर किंवा इ-मेलवर त्या प्रती पाठवायच्या, ज्याला जे महत्वाचं वाटेल त्याची प्रत तो काढून घेईल असं नाही का करता येणार? पण नाही, आम्हाला लेखीच मिळालं पाहीजे असा हट्ट असतो. इगोसाठी, दुसरं काय..!!

इ-मेलचंही तसंच. प्रमाण कमी असलं तरी इ-मेलचेही दोन-दोन प्रिन्टआऊट काढून फाईल करून ठेवणारे महाभाग आहेत आपल्याकडे. खरं तर इ-मेल मधला पत्रव्यवहार जोवर आपण डिलीट करत नाही, तोवर तो तसाच असतो आणि कधीही-कुठेही पाहाता-दाखवता येऊ शकतो. हे लक्षात न घेता सरळ प्रिन्टआऊट घेऊन ठेवले जातात आणि कागद-फायलिंगची संख्या नाहक वाढवली जाते.

आपल्याकडे कागदाला ‘पुरावा’ म्हणूनच भरपूर वापरला जातो. आपण राहातोय डिजीटल जगात, पण विचाराने मात्र त्याच अद्याप ‘लेखी’ युगात आहोत. ‘कागदा’ला आपल्या जीवनात अतोनात महत्व आहे. लांबपल्ल्याचं तिकिट हल्ली डिजीटल चालत असलं तरी आपण त्याचं प्रिन्ट आऊट काढूनच प्रवासाला निघतो. त्याची कारणं दोन, एक म्हणजे डिजीटलवर आपला भरवसा नसतो आणि दुसरं म्हणजे, तो तिकीट तपासणीस आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या तिकिटावर विश्वास ठेवीलंच याची आपल्याला खात्री नसते. एकूण काय, तर पेपर हवाच.

काही लोक डिजीटलचा दुरुपयोग करतात हे खरंय पण म्हणून सर्वांनाच लबाड समजून एका मापाने तोलून कागदाची मागणी करणं कितपत योग्य आहे हे मला समजत नाही. डिजीटल प्रणाली जास्तीत जास्त सुरंक्षित करणं हा त्यावर उपाय आहे, प्रिन्ट आऊट नाही.

हवा तसा कागद वापरायचा, त्या कागदालाठी बेसुमार जंगलतोड करायची आणि वर ‘शीऽऽ किती हाॅट क्लायमेट होत चाललंय हल्ली’ म्हणून कागदाच्याच टिश्यूने चेहेरा, कपाळ, नाक, गळ्याचा घाम पुसायचा हे कितपत योग्य आहे. टिश्यूवरनं आठवलं, हल्ली रुमालाने हात-चेहेरा पुसणं मागासलेपणाचं समजतात म्हणे आणि टिश्यू पेपरचा वापर पुढारलेपणा..! टाॅयलेटमधेही हल्ली पेपरच (वाचण्यासाठी नव्हे, तर..) वापरतात अनेक सुधारलेले माॅडर्न लोक. माॅडर्नपणाची निशाणीच आहे ती हल्लीच्या..

पूर्वी लोक निगुतीनं कागद वापरायचे. लिहीताना, टाईप करताना पुरेपुर काळजी घ्यायचे. झेराॅक्सच्या आगमनापूर्वी कार्बन कागद वापरून प्रती काढल्या जायच्या. आताच्या कंप्युटरसारखी त्यावेळच्या टाईपरायटरमधे सेव्ह करायची सोय नसली तरी डोक्यात सगळंच आपोआप आॅटो सेव्ह व्हायचं. गोळा-बेरीज काय, तर आधुनिक संगणकीय युगात आपण पेपरलेसच्या गप्पा मारत परंतू जास्तीत जास्त कागद वापरत ‘ग्लोबल वाॅर्मिंग’वर वातानुकुलीत केबीनीत बसून चर्चा करत असतो. कथनी आणि करनी यात काही एक संबंधं नसणारे आपण, ढोंगी आहोत हे मात्र खरं..!!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..