नवीन लेखन...

जुन्या मराठी पंगतीतील श्लोक आणि मजेदार गाणी ( भाग २ )

महाराष्ट्रामध्ये विविध कारणांसाठी एकत्र जेवणावळींची  खूप जुनी प्रथा आणि जेवण सुरु असतांना देवाचे आणि सुसंगत विषयांवरील संस्कृत किंवा मराठी श्लोक म्हणणे, त्यातील वैविध्य याबद्दल मी या आधीच्या भागात लिहिलेले आपण वाचले असेलच. तेथे म्हटला जाणारा अर्ज आपण पहिला तशी एक निमंत्रण पत्रिका ( त्यावेळी कुंकुम पत्रिका, कुंकोत्री, कंकोत्री इत्यादी म्हटले जाई ) देखील असायची. चि. सौ. कां. जिलेबीबाई हिचा शुभविवाह चि. मठ्ठेराव यांचेशी …. इत्यादी मजकूर असे.

महाराष्ट्राचे महाकवी, आधुनिक वाल्मिकी  कै. ग. दि. माडगूळकर यांनी जेवणातील ५० हुन अधिक पदार्थ आणि भाज्यांचा उल्लेख करून एक कविता रचली होती. त्यांनी वापरलेली विशेषणेही खासच आहेत. अनेक कार्यक्रमात सुप्रसिद्ध निवेदक भाऊ मराठे ही कविता उत्तम उच्चारांसह तोंडपाठ म्हणत असत . ही कविता खाली देत आहे.
-मकरंद करंदीकर. 
 

।। काय वाढले  पानावरती ।।

काय वाढले  पानावरती, 
ऐकून घ्यावा थाट संप्रती,
धवल लवण हे पुढे वाढले, 
मेतकूट मग पिवळे सजले
आले लोणचे बहु मुरलेले, 
आणि लिंबू रसरसलेले,
किसून आवळे मधुर केले,
कृष्णा काठचे वांगे आणले,
खमंग त्याचे भरित केले,
निरनिराळे चटके नटले,
चटण्यांचे बहु नवे मासले,
संमेलनची त्यांचे भरले,
मिरची खोबरे ती सह ओले, 
तीळ भाजूनी त्यात वाटले,
कवठ गुळाचे मिलन झाले,
पंचामृत त्या जवळी आले,
वास तयांचे हवेत भरले,
अंतरी अण्णा अधीर जाहले!
भिजल्या डाळी नंतर आल्या,
काही वाटल्या काही मोकळ्या,
काही वाटुन सुरेख तळल्या, 
कोशिंबिरी च्या ओळी जमल्या,
शुभ्र काकड्या होत्या किसल्या,
मुळा कोवळा मिरच्या ओल्या, 
केळी कापून चकल्या केल्या,
चिरुन पेरुच्या फोडी सजल्या,
एकरूप त्या दह्यात झाल्या,
भाज्या आल्या आळू-घोसाळी,
रान कारली वांगी काळी, 
सुरण तोंडली आणि पडवळी,
चुका चाकवत मेथी कवळी,
चंदन बटवा भेंडी कवळी,
फणस कोवळा हिरवी केळी,
काजुगरांची गोडी निराळी,
दुधी भोपळा आणि रताळी,
किती प्रकारे वेगवेगळी,
फेण्या, पापड्या आणि सांडगे,
कुणी आणुनी वाढी वेगे,
गव्हल्या नकुल्या धवल मालत्या,
खिरी तयांच्या शोभत होत्या,
शेवयांच्या खिरी वाटल्या,
आमट्यांनी मग वाट्या भरल्या,
सार गोडसे रातंब्याचे,
भरले प्याले मधुर कढीचे,
कणीदार बहू तूप सुगंधी,
भात वाढण्या थोडा अवधी …. 

 …. महाकवी ग दि माडगुळकर.

Avatar
About मकरंद करंदीकर 43 Articles
मकरंद शांताराम करंदीकर यांनी बँक ऑफ इंडियातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या अनेक छंदांना पूर्णपणे वाहून घेतले. गेली सुमारे ५० वर्षे ते दिव्यांचा - विशेषत: भारतीय दिव्यांचा संग्रह करीत आहे. त्यांच्याकडील हा संग्रह भारतातील दिव्यांचा सर्वात मोठा संग्रह आहे. या विक्रमासाठी त्यांचे नाव २ वर्षे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आणि एकदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे. याचबरोबर भांडी, बैठे खेळ, पत्ते, जुनी प्रसाधने, लेखन साहित्य असे इतर अनेक छंद त्यांनी जोपासले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..