नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौतीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ

धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग दोन

धान्य जुनं करून वापरल्याने त्यातील पाण्याचा अंश कमी होतो. आणि ते कोरडे, सुके, रूक्ष व्हायला लागते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे जे नूतन असते, ते रसदार असते. (नूतन म्हणजे नवीन. गैरसमज नकोत. ) ओली फळे रसदार असतात आणि जसजसे फळ सुकत जाते, तसा त्यातील रस कमी होत जातो. खजूर आणि खारीक, आलं आणि सुंठ, द्राक्षे आणि मनुका या जोड्या लक्षात आणा, म्हणजे हा विषय समजेल. (उगाच आंबटगोड गैरसमज नकोत.)

ज्या फळामधील रस. (रस म्हणजे जलमहाभूत.) कमी होत जातो, ते टिकाऊ होत जाते. आमरस आणि आंब्याची पोळी ( आमच्या कोकणात आंब्याच्या पोळीला “साट” म्हणतात.) यात टिकाऊ काय आहे ? साट जास्ती दिवस टिकते, कारण त्यातील पाणी कमी होत जाते.

निसर्गामधे सूर्य हा जणुकाही साक्षात अग्निदेव. अन्न पदार्थातील रस, पाणी, द्रवांश, जलमहाभूत ओढून घेत असतो. याला “आदान कर्म” असे म्हणतात. या पाण्याला शोषून, ओढून घेण्यामुळे अन्न टिकाऊ बनते. आजच्या भाषेत, सूर्यापासून येणाऱ्या काही किरणांमधून काही उपकारक तर काही अपायकारक किरणे येत असतात. या किरणांमधे प्रचंड उर्जा साठवलेली असते. व्हिटामिन डी सारखी उर्जा जी फक्त थेट सूर्य किरणांमधूनच मिळत असते, ती पत्र्याच्या डब्यातील टाॅनिकच्या पावडरीमधे कशी भरतात, हा मोठा संशोधनाचा विषय आहे. असो.

धान्य वाळवून ठेवल्याने, त्यांना चार पाच कडकडीत उन्हे दिल्याने ती टिकून रहातात, हे सत्य आपण बघतोच आहोत. धान्यामधे टोका, बरड आदि जंतुसंसर्ग देखील होत नाही.

टीव्हीवरील एका कंपनीच्या बासमती तांदळाची जाहीरात बघितली आहे ? ती कंपनी चक्क जाहीरात करते आहे, की आमचे तांदुळ एवढे जुने करून ठेवल्यानंतर, आता आम्ही विकायला काढले आहेत. ( म्हणून त्याची किंमत एवढी जास्त आहे)
बिझनेस सोडला तर जाहीरातीमधे तथ्य आहे. जुना तांदुळ शिजल्यानंतर, तो वाफेवर झाकून ठेवल्यानंतर, छान फुलतो. नवीन तांदळाचा भात केला तर कसा होतो, ते सुगृहिणीला विचारून बघा. शिजताना कमी पाण्यात जरी शिजवला तरी, नवीन तांदळामधे अंगभूत पाणी जास्ती असल्याने, शिजताना जरा जोरात ढवळले तरी त्याची कणी होते, तुकडा पडतो, परिणामी तो भात चिकचिकित, गिजगिजीत होतो. अशा भाताची बिर्याणी कशी चांगली होणार ?

भातात अपेक्षित असलेला मोकळेपणा येण्यासाठी तो जुनाच हवा ! जुना करूनच वापरायला हवा.

प्लॅस्टिकच्या डब्यात भात साठवून ठेवले तर, प्लॅस्टिकचे दुष्परिणाम तर त्यावर होणारच. प्लॅस्टिकमधे उष्णता असतेच, पण डबा अगदी “एअर टाईट” झाल्यामुळे भाताच्या गोट्यातील आतील पाण्याची होणारी जी वाफ आहे, ती कुठे जाणार ? ती बाहेर तर जाऊच शकत नाही, म्हणजे ती पुनः डब्यातील भातातच मुरून राहते.

गवताच्या मुडीत साठवून ठेवलेला भात आणखी हलका होतो, कारण हे गवताच्या मुडीत, साठवलेले भात “वेल व्हेंटिलेटेड” असते. या मुडीतून भाताचा गोटा बाहेर पडणार नाही, पण तयार होणारी वाफ मात्र गवतामधून बाहेर जायला, भरपूर जागा असते. हीच तर निसर्गाची किमया आहे.

गवतामधे मात्र प्रचंड उष्णता दडलेली असते. ही उष्णता मुडीमधील भातातील जलांशाचे, वाफेत रूपांतर करायला पुरेशी असते.

आवश्यक असतील ते बाकी सर्व बदल घडवायला गवताच्या मुडीतील निसर्ग समर्थ आहे.
सिर्फ अपना “मूड” बनना चाहीये ।

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
14.05.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..