नवीन लेखन...

उरलेल्या पदार्थाची शिळासप्तमी

वरण-भात, भाजी-पोळी असे नेहमीचे पदार्थ कधी कधी खाण्याचा अतिशय कंटाळा येतो. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असल्याने उरलेलं अन्न टाकून देण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत नाही. त्यातूनच उरलेल्या पदार्थामधून नवीन पदार्थ तयार करण्याच्या पद्धती रूढ झाल्या आहेत. असे हे पदार्थ पूर्वापार चालत आले असून आजकालच्या पाश्चात्त्य पदार्थामुळे त्यांना काहीसा विसर पडलेला दिसतो. मात्र यातल्या काही पदार्थाना आपण पाश्चात्त्य पदार्थाचा टच देऊ शकतो.

idliभारतीय संस्कृतीत पाककलेला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. घरात आलेले पाहुणे असो की नेहमीचेच घरातले असो, त्या घरातली गृहिणी चांगलं-चुंगल जेवण बनवण्याचा प्रयत्न करतच असते. अन्न उरलं तरी चालेल; पण कोणी उपाशी झोपता कामा नये ही भारतीय गृहिणींची भाबडी समजूत आहे.

उरलेलं शिळपाकं तसंच गरम करून सकाळच्या प्रहरी नाश्ता करण्याची पद्धत मोडली आहे. म्हणजे हल्ली दररोज काहीतरी नवीन आणि त्यातल्या त्यात पाश्चिमात्य पद्धतीची न्याहरी करण्याची प्रथा रूढ होत आहे. असं जरी असलं तरी ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असल्याने उरलेलं अन्न टाकून देण्याची पद्धत भारतीय संस्कृतीत नाही. त्यातूनच नव्या पाककृती उदयास आल्या आहेत. टाकाऊपासून टिकाऊ बनवण्याची क्रिया पाककृतीतही दिसून येते.

पूर्वी अशा कितीतरी पाककृती घराघरांत केल्या जायच्या. मात्र आता नवीन करण्याच्या नादात हे पदार्थ काहीसे विस्मृतीत गेलेले दिसतात. मात्र यातले कितीतरी पदार्थ सध्या टीव्हीवर किंवा इंटरनेटवरही सापडतात. उलट त्यात सांगितलेले काही पदार्थ तर आपल्याला माहीतही नसतात.

मग साध्या, सोप्या आणि आपल्या स्वयंपाकघरात सर्रास आढळणा-या वस्तूंना घेऊन किंवा उरलेल्या अन्नापासून काहीतरी बनवता आलं तर! घाई-गडबडीच्या जीवनात रोज नाश्त्याला नवीन काहीतरी बनवणं म्हणजे किती त्रासदायक असतं. अशा वेळेस अगदी कमी वेळात, उरलेल्या शिळ्या अन्नापासून काहीतरी चागलं, चटपटीत काय करता येईल हे पाहूया.


riseभात

काही लोकांच्या घरात भात नेहमीचा पदार्थ नसतो. तर काही जण फक्त रात्रीच्या वेळी भात बनवताना दिसतात. भातामुळे सुस्ती येत असल्याने भात खाणं टाळलं जातं. अशा वेळेस बनवलेला भात वाया घालवण्यापेक्षा गृहिणी फोडणीच्या भाताची सोय करतात. कमी वेळात पोट भरेल असा नाश्ता तयार होतो, त्यामुळे फोडणीच्या भाताला फार गृहिणी महत्त्व देतात आणि त्याच्या चमचमित चवीमुळे लहान मुलंही आवडीने खातात.

व्हेज बिर्याणी : उरलेला भाताचा चुरा करून त्यात लाल तिखट, मीठ, हळद, जिरा पावडर टाकावी. तव्यावर तेल, राई यांची फोडणी द्यावी. दिलेल्या फोडणीवर चुरा केलेला भात परतावा. काही गृहिणी भात चविष्ट होण्यासाठी शेंगदाणेही टाकतात. शिवाय कोथिंबीर, कढीपत्ता यामुळे चवही वाढते. लहान मुलांच्या डब्यातील हा आवडता पदार्थ आहे. शिवाय कॉलेजिअन्स फोडणीच्या भाताला व्हेज बिर्याणी म्हणतात.


चपाती

कधी-कधी आपल्या घरात पाहुणे येणार असतात. त्यामुळे घरातील गृहिणी साहजिकच नेहमीपेक्षा जास्त आणि सगळ्यांना पुरेल एवढं अन्न शिजवते. पाहुणे लाजेखातर थोडंसंच खाऊन निघून जातात. अशा वेळेस उरलेल्या चपात्यांचं काय करावं? हा मोठा प्रश्न असतो. त्यातून तिखट चिवडा, गोड चुरा, कुरकुरीत चिवडा असं बरंच काही करता येईल.

चपाती चिवडा :

चपातीचे लहान लहान तुकडे करून घ्यावेत. तव्यावर तेल, राई- जिरं, लसूण, कांदा यांची फोडणी द्यावी. लहान तुकडे केलेल्या चपातीवर तिखट, मीठ, हळद आपल्या चवीनुसार टाकावं. फोडणी दिल्यानंतर तिखट, मीठ, हळद टाकलेले chapatiचपातीचे तुकडे तव्यावर टाकावे. तुकडे लाल होईपर्यंत तव्यावर ठेवावे. त्यानंतर तयार झालेला चपाती चिवडा आपण ब्रेडसोबत किंवा नुसता खाऊ शकतो.

गोड चुरा :

गोड-धोड खाण्याची आवड असणाऱ्यांनाही या गोड चु-याचा उरलेल्या चपातीचा आस्वाद घेता येतो. चपातीचा बारीक चुरा करून त्यात साखर टाकावी. साखर आणि चपातीचा चुरा यांचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. एकजीव केलेले मिश्रण तव्यावर मंद आचेवर परतून घ्यावे. ५ मिनिटे मंद आचेवर हे मिश्रण परतावे. मग तयार झाला ना गोड चुरा. खासकरून लहान मुलांना हा चुरा फार आवडतो.

लाडू :

उरलेल्या शिळ्या चपातीचा चुरा करून घ्यावा. त्यातच आवडीनुसार गूळ किंवा साखर घालून घ्यावं. मिक्सरला लावला तरीही चालतो. आता त्यात थोडंसं तूप घालून ते एकजीव करावं आणि त्याचे लाडू वळावेत. हे लाडूही छान लागतात. तसंच दिवसभर टिकतातही.

कुरकुरीत कुरकुरे :

चपातीचे लहान बारीक तुकडे करून घ्यावे. त्यानंतर ते तेलात तळून घ्यावे. तेलात तळल्याने चपातीचे तुकडे कुरकुरीत बनतात, त्यामुळे आपण ते चहासोबत खाऊ शकतो.


chapati rollविविध भाज्या

काही घरात प्रत्येकाच्या चवीनुसार, आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात. एका वेळी ३ ते ४ प्रकारच्या भाज्या वाढण्याची कित्येकांना सवय असते. मग या भाज्या काही वेळा उरतात. या भाज्या उरल्यावर काय करावं हा प्रश्न कित्येकांना पडतो. कारण कोणतीही भाजी फार काळ टिकत नाही. अशा वेळेस रात्री भाजी उरल्यावर ती पुन्हा गरम करून घ्यावी म्हणजे रात्रभर फ्रिजमध्ये भाजी ठेवल्यास खराब होत नाही.

टोस्ट सँडवीच :

उरलेल्या भाज्यांचं आपण टोस्ट सँडवीच बनवू शकतो. सगळ्या भाज्या एकत्र कराव्यात. तव्यावर थोडय़ा परतवून घ्याव्यात. ब्रेडवर बटर लावून घ्यावं, चवीनुसार व घरात असलेली हिरवी चटणी त्यावर लावावी. आजकाल हिरवी चटणी कित्येकांच्या घरात असते. त्यानंतर ब्रेडवर भाजी पसरवून घ्यावी. ब्रेडची दुसरी बाजू त्यावर लावून घ्यावी. त्यानंतर सँडवीच मेकरमध्ये ब्रेड ठेवून द्यावा. २ ते ३ मिनिटांत आपला टोस्ट सँडवीच घरच्या घरी तयार.

व्हेज फ्रॅन्की :

सध्या मुलांना पाश्चिमात्य पदार्थाचं खूप वेड आहे. त्यामुळे या उरलेल्या भाज्यांचं काय करावं? असा प्रश्न गृहिणीला पडला तर त्याची चिंता करणं सोडून द्या. मुलांना भाज्या खायला आवडत नाहीत, मात्र फ्रॅन्कीवर चांगलाच ताव मारतात. अशा वेळेस आपण व्हेज फ्रॅन्की घरच्या घरी बनवू शकतो. चपातीला आतील बाजूने, बटर किंवा चीझ पसरवून घ्यावं.

उरलेल्या भाज्यांचं मिश्रण करून घ्यावं. ते मिश्रण संपूर्ण चपातीवर लावावे. मिश्रण लावून झाल्यावर त्यावर दुसरी चपाती ठेवावी. किंवा तीच चपाती गुंडाळावी. तव्यावर तूप किंवा बटर लावून ती फ्रॅन्की मंद आचेवर परतून घ्यावी. तयार झालेली फ्रॅन्की आपण घरात असलेल्या कोणत्याही चटणी किंवा सॉससोबतही खाऊ शकतो.

स्नेहा कोलते 
Sneha Kolte
snehagkolte.sk@gmail.com

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..