नवीन लेखन...

आमचे लहानपणीची दिवाळी

लहानपणी सुगीची काम सुरु असताना थंडीची चाहूल लागली की घरापुढच्या अंगणात शेकोट्या पेटायच्या. माणसं अंगावर शाल चादरी पांघरून हात पुढं करुन जाळावर ऊब घेत शेकायची. बच्चे मंडळीवर शेकोटी जळत राहण्यासाठी लागणारा पाला, पाचट आणायची जाबादारी असायची. मग शेकताना शेकोटीवर साऱ्या गावाच्या चर्चा चालायच्या. कुणाला एवढं जुंधळं झालं. तमक्याच्या भुईमुगाला किती शेंगाचं घस लागलं इथपासुन ते अमक्याची पोरगी पावडर लावून सारखी पारासमोरुन फिरतेय इथपर्यन्त त्या चर्चाना उधान यायचं. साऱ्या गावावर सकाळी धुक्याची झालर पांघरलेली असायची.

अन त्या बोचऱ्या थंडीसोबच दिवाळीची चाहूल लागायची. मग आमच्या आनंदाला उधान यायचं. गुरांच्या गोठ्याच्या बाहेर पोरी शेणाने पाची पांडव काढायच्या. ते तयार करताना बघायला मज़्ज़ा यायची. गावातल्या रेशन दुकानासमोर माणसं रांगा लावायची. घराघरातल्या चुलीवर कढई चढ़ली की बायका एकमेकींच्या घराकडे “शेवगा दे, चाळा दे, आमच्या करंज्या लाटायला ये” म्हणत धावपळ कारायच्या. लाटलेली करंजी फिरकिने कापयचं काम आम्हाला मिळायचं.

गाणी चालायची. गोष्ठी चालायच्या. गप्पा रंगायच्या. नवीन लग्न होवून नांदायला गेलेल्या लेकी गावच्या वेशीतुन आत यायच्या. त्यांच्या भोवती सायकलवरून चिली पिली पिशव्या घेवून गावात शिरायची. मग शेजाऱ्या पाजाऱ्यासोबत सुखाच्या गप्पा रंगत. नातीकडं बघुन म्हाताऱ्या कोताऱ्या हरकुन जात. घरात नवी केरसुनी खरेदी केली जायची.

आम्हाला आठ दिवस आधीच किल्ला बनवायचे वेध लागायचे. मग कुंभाराच्या टेकडीवरुन सायकला पोते लावून माती आणली जायची. चार पाच दिवसानी किल्ला तयार झाला की वर मावळे चढायचे. आतासारखे पूर्वी आकाशकंदिल विकत घेण्याऐवजी ते घरीच बनविले जात. एखादाच् श्रीमंत बाजारातुन चांदनी विकत आणायचा. ष्टकोनी आकाराचे आकाशकंदिल बनविले जात. यासाठी ओल्या बांबूच्या नाहीतर निरगुडीच्या फोका वापरल्या जात. हा आकाशकंदिल बनवायचा उत्साह इतका असायचा की एखदा वस्तीवरच्या अण्णाच्या भुईमुगाच्या वावरात अर्धा एकर डहाळे उपटू लागलो तेव्हा रात्री त्यानी रंगबिरंगी कागद चिकटवून आकाशकंदिल बनवून दिल्याचा अजुनही आठवतो. तयार केलेला आकाशकंदिल एका लांब बाम्बूला बांधून घरावर चढवला जायचा.

मग पहिल्या अंघोळीची तयारी अधल्या रात्रीच् सुरु व्हायची. विहिरीवरुन बाहेरचा मातीचा रांजन धुवून काठोकाठ भरला जायचा. बाहेरची पाणी तापवायची चुल पांढऱ्या मातीनं आज्जी सारवुन काढायची. अंगणात शेणाचा सडा शिंपडला जायचा. तेव्हा रांगोळीसुद्धा आम्ही घरीच तयार करायचो. नदीतून गारगोठया आणून त्या फोडून बारीक वाटून रांगोळी बनवायचो. पहाट होताच आई अंथरुणातुन उठवायची. दारात कुंभारवाडयातून आणलेल्या मातीच्या पणत्यांचे दिवे अंगणातल्या तुळशीभोवती लावलेले असायचे. तोपर्यन्त बाहेरच्या चुलीवर आज्जीनं पाण्याला आदण आणलेलं असायचं. मग दगडानी रचून तयार केलेल्या न्हाणीत मांडलेल्या एका मोठ्या दगडावर बसून तेलानं मालिश केलेल्या अंगावर उकळत्या पाण्यानं कुड़कुड़त्या थंडीत आईनं घातलेल्या आंघोळीला जगात कशाचीच सर येणार नाही. अंगावर वर्षातून एखदाच् मिळणारे नवीन कपड़े चढायचे. तोपर्यन्त पहाटेच्या अंधारात गावातूनच न्हवे तर आजुबाजूच्या गावातूनही फटाक्यांचा आवाज यायचा. सारा आसमंत दणाणून जायचा. पण आम्हाला वाजवायला कुठे टिकल्याच्या चार डब्या मिळायच्या. सोबत बारीक तोटयांची एखांदी माळ. मग ती आम्ही उसवुन एक एक तोटा पुरवून पुरवून वाजवायचो. शेजारी चन्दू नावाचा एक गरीब मित्र असायचा. कधी अंगाला दिवाळीत नवी कपड़े घातल्याचे मी त्याला कधीच बघितले नाही. पण तो हार मानायचा नाही. मग तो फटाके मिळायचे नाहीत म्हणून हाताने दोरी वळून वादीचा चाबुक तयार करायचा. अन पहाटेच्या अंधारात बाहेरच्या रस्तावर येवून सारी गरिबी विसरून चाबुक रस्त्यावर आपटून “फाड़ फाड़” फटाक्यासारखा आवाज हवेत काढायचा. त्यातही तो समाधानी दिसायचा. रिकामे वाजवून फुटलेले फटाके आम्ही त्याच्यासोबत जमवून त्यातून दारु काढून ती पुन्हा रिकाम्या तोट्यात घालून वाजवायचो. मग दिवस उगवुन वर आला की फराळाच्या डब्यावर उड्या पड़त. पण त्या गरीबीतही वाड वडिलांनी जपलेले सण साजरे करण्याचा एक उत्साह होता. एक संस्कार होता.

…पूर्वी सारखी दिवाळीची ती मज़्ज़ा आता राहिली नाही. काळ पुढे धावत राहतो. बालपणाच्या त्या कोवळ्या खांद्यावर असलेल्या चिमुकल्या मेंदुवर आता जगातील बऱ्या वाईट अनुभवांचा घट्ट मुलामा चढलेला आहे. आता पहाटे उठून न्हाणीतल्या दगडावर आंघोळ करायला ना न्हाणी राहिली. ना बाहेरच्या कुड़कुड़त्या थंडीत चुलीवर पाण्याला जाळ घालून आदण आणणारी आज्जी राहिली. अंगणात आता मातीचा किल्ला उभा राहत नाही ना त्यावर मावळे चढ़त नाहीत. ष्टकोनी आकाराचा आकाशकंदिल तयार करण्यातली मज़्ज़ा पाकिटातील तीनशे रूपये अगदी सहज मोजून घराबाहेर लावणाऱ्या आताच्या डिजिटल पिढीला तो आनंद कधीच घेता येणार नाही. आता रांगोळीसाठी नदीतून पांढऱ्या गारगोठयाचे खड़े गोळा करायला पांढरपेशीपणाचा बुरखा पाऊलाना पुढे पडू देत नाही. अन डब्यातला लाडू काढून तो रस्त्याने फिरत खाण्याचा जिभेला मोहही होत नाही. गरीबीतही दिवाळी साजरी करण्याचा एक आनंद होता. जोश होता. पुढे जगाच्या बाजारात उठणाऱ्या वादळ वाऱ्याना छातीवर झेलण्याची ताकत या जुन्या काळानेच दिलीय. म्हणूनच लहान होवून जगूया. खुप क्षणभंगुर आयुष्य आपण जगतोय. छोट्या छोट्या गोष्ठीतसुद्धा खुप सुख लपलेले असते…

दिवाळीच्या सर्वाना खुप खुप शुभेच्छा!!!

(फेसबुकवरुन आलेला मेसेज… सध्या बराच फिरतोय.. )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..