नवीन लेखन...

“अोरॅकल मधलं मिरॅकल”

Cloud Computing and Enterprising क्षेत्रातील जगातील सर्वात मोठया अमेरिकास्थित कंपनी Oracle चा “Oracle Open World” हा सर्वात मोठा आणि जागतिकदृष्ट्या मानाचा कार्यक्रम नुकताच सन्फ्रान्सिस्को येथे पार पडला.
तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक मान्यवरांना या परिषदेत आपले विचार मांडण्यासाठी बोलावण्यात येते.
“आमचे वक्ते हे भविष्याला नवा आकार देणारे लोक आहेत” अशी शेखी मिरवत Oracle या कार्यक्रमासाठी आपले वक्ते निवडते. आणि या वेळी प्रथमच एका भारतीय नेत्याला त्यात आमंत्रित करण्यात आले, त्या क्षेत्रातील धुरंधरांसमोर आपले मत मांडण्यासाठी !
ते नेतेे – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस.
त्या जगाशी तसे पाहता अर्थाअर्थी संबंध नसलेल्या नेत्यास मिळालेले आमंत्रण ही भारत व मुख्यत्वे महाराष्ट्रासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे.
त्या परिषदेचा हा लेखाजोखा –
१९ सप्टेंबर ला अमेरिकन वेळेनुसार सुमारे सकाळी नऊ वाजता परिषद सुरु झाली. मुख्यमंत्र्यांच्याआधी काही वक्त्यांनी आपली मते मांडली. त्यानंतर Oracle च्या CEO म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कॅट्झ मंचावर आल्या. पुढच्या वक्त्याविषयी बोलायला त्यांनी सुरुवात केली, तेव्हाच त्यांच्या चेहऱ्यावर आदर झलकत होता.
“मी फेब्रुवारी महिन्यात Make In India Week च्या वेळी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले, तेव्हा तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांच्या महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्याचे त्यांचे प्रामाणिक प्रयत्न पाहून भारावून गेले” असे त्या सांगत होत्या. अत्यंत आदर आणि कौतुकाने..
आणि शेवटी सगळे शब्द गुंडाळून , “आता काही क्षणांतच आपल्याला CM यांना ऐकायला मिळेल आणि खरोखर सांगते, मी फारच excited आहे ” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना मंचावर आमंत्रित केले.
माननीय मुख्यमंत्री व्यासपीठावर येण्याआधी महाराष्ट्र सरकारच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी व व्हिजन वर एका लघुपटाद्वारे दृष्टिक्षेप टाकण्यात आला. “आपले सरकार” या app च्या माध्यमातून सर्व शासकीय सेवा एका छताखाली आणण्याच्या प्रयत्नाचे विवरण केल्या गेले. ‘People First’ या सरकारच्या तत्त्वाचाही उल्लेख करण्यात आला.
तद्नंतर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस मंचावर आले, तेच एक वेगळा आत्मविश्वास घेऊन. सर्वप्रथम त्यांनी आपले ठेवणीतले मोहक हास्य करत CEO सॅफ्रा यांचे आभार मानले आणि मग “Brothers and Sisters” – “बंधू आणि भगिनींनो” म्हणत आपल्या भाषणास सुरुवात केली.
आणि त्यानंतर ” येथे जमलेल्या सर्व मान्यवरांकडे पाहता, मी क्षणभर विचारात पडलो, की मी येथे का आलो आहे?” अशा जबरी वाक्याने आपले विचार मांडण्यास प्रारंभ केला.
“भारत हा महत्त्वाकांक्षी युवांचा देश आहे. युवा पिढीच भारताची खरी ताकद आहे आणि आता ती योग्य वेळ आली आहे की आम्ही या पिढीस विकासाच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून द्याव्यात, आता अधिक वाट पाहण्यात अर्थ नाही” असे बोलून त्यांनी आपला मनोदय व्यक्त केला.
Cloud Computing and Big Data Analytics या क्लिष्ट तंत्रज्ञानाचा वापर केल्यास महाराष्ट्रातील तरुणाई व खेड्याखेड्यांवर कसा प्रभाव पडेल, सरकारात अधिकाधिक कार्यक्षमता व पारदर्शिता कशी प्रस्थापित होईल हे सर्व सांगतानाच “तंत्रज्ञान हे तटस्थ असते. ते लिंग, व्यक्ती किंवा कुठल्याही अन्य निकषाआधारे भेदभाव करत नाही.” हे अत्यंत प्रगल्भ विधान त्यांनी केले.
“आम्हाला एक प्रतिक्रियाशील, पारदर्शक सरकार प्रस्थापित करायचे आहे, जे तंत्रज्ञानाद्वारे साध्य केल्या जाईल.”
“आम्हाला बदल घडवून आणायचा आहे. असा बदल, की राज्याचा प्रत्येक नागरिक सरकारचा भाग असेल आणि आपला सहभागही नोंदवेल. तंत्रज्ञानाच्या मदतीने Oracle आमचे हे स्वप्न पूर्ण करेल.”
असे सांगत त्यांनी तिथे उपस्थित अन्य मान्यवरांनाही महाराष्ट्रासोबत भागीदारी करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर CEO सॅफ्रा यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत Oracle च्या सहभागाबद्दल त्यांचे काय मत आहे असा प्रश्न केला.
तेव्हा “आपण एका अशा काळात राहतो जिथे आपण जो विचार करतो, तंत्रज्ञान ते प्रत्यक्षात आणते. आणि अशा प्रकारे माझ्या राज्याच्या हर एक, शहरी किंवा अगदी दूरस्थ ग्रामीण भागातील नागरिकाला माझ्या सरकारशी जोडता यावे, एवढीच माझी Oracle कडून अपेक्षा आहे.” हे अत्यंत दूरदर्शी आणि भावनिक विधान त्यांनी केले.
त्याचबरोबर “कोणत्याही परिवर्तनाच्या प्रक्रियेत राजकीय नेतृत्व हे केवळ कल्पनानिर्मितीचे काम करते, तर तंत्रज्ञ ती कल्पना प्रत्यक्षात साकारतात.”
असे सांगत त्यांनी Oracle च्या भावी योगदानाचे महत्त्वही अधोरेखित केले.
आणि इतकेच नव्हे तर, MOU signing आधी सॅफ्रा यांना महाराष्ट्र सरकारच्या ‘तंत्रज्ञान सल्लागार’ मंडळात सहभागी होण्याची विनंती करत मुख्यमंत्र्यांनी आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. CEO सॅफ्रा कॅट्झ यांनी तसे बोलूनही दाखवले.
एकूणच यंदाची Oracle Open World Conference म्हणजे अवघ्या महाराष्ट्रासाठी देखील आश्चर्याचा एक गोड, सुखद व आश्वासक असा धक्का होती.
माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची देहबोली, लहेजा, आत्मविश्वास, आणि एकूणच त्यांचे Mannerism स्वतःच हे सगळे काही स्पष्ट करते. जागतिक पटलावर वावरतांना स्वतःला कशा प्रकारे Present करावं हे त्यांना अगदी बरोबर समजतं.
कदाचित अतिशयोक्तीही वाटेल, पण या एकाच परिषदेतून त्यांनी, ते एक जागतिक नेते होण्याच्या पात्रतेचे आहेत अन त्या दिशेने त्यांची वाटचालही योग्यरित्या चालू आहे हे दाखवून दिलंय.
Oracle सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीकडून एवढा आदर व कौतुक प्राप्त करणे, अगदी उच्चविद्याविभूषित तंत्रज्ञांसोबत इतकं लिलया वावरणे, आणि ओघाने भारताची व मुख्यत्त्वे महाराष्ट्र राज्याची शान वाढवणे व त्याचबरोबर विकासासाठी नवनवे व समकालीन उपाय शोधून ते राबवणे,
या साऱ्या गोष्टी श्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या उज्ज्वल व नेत्रदीपक भवितव्याची नांदीच आहेत..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..