नवीन लेखन...

बहिणीची भेट

 

मी आणि व्यवस्थापकीय विभागातला एक सहकारी असे आम्ही नगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होतो. कोपरगाव, राहता, संगमनेर, श्रीरामपूर हा तर माझ्या खूपच परिचयाचा असा परिसर. या भागातून माझ्या लहानपणी अनेकवार फिरलो होतो. काही वर्षे कोपरगावात शिकलो होतो. मित्रांचा परिवारही या भागात होता. एका अर्थानं माझ्या दृष्टीनं हा माहेरचा दौरा होता. राहता येथे एक कार्यक्रम होता. तो आटोपायला अकरा वाजले. नंतर शिर्डीला जावं असं ठरलं. त्यावेळी साईबाबाचं दर्शन इतकं अवघड नव्हतं. दुपारी बाराच्या आरतीलासुद्धा सहज जाता यायचं. कोपरगाव ते शिर्डी असं सायकलनंही अनेकवेळा आलेलो होतो. बाबाचं दर्शन झालं. आता इथंच जेवणं अन् पुढे जाणं असा विचार सुरू होता. मी माझ्या सहकार्‍याला म्हटलं. इथनं अवघ्या दहा किलोमीटरवर माझ्या बहिणीचं शेत आहे. शेतावरच घर करून ती राहते. तिथं जाऊ आपण. घरचं जेवण होईल आणि बहिणीला भेटणंही होईल. या प्रस्तावावर वाद होण्याचा प्रश्न नव्हता. आमची गाडी बहिणीच्या वस्तीकडे निघाली. माझी बहीण, दोन वर्षांनी मोठी. वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षे लग्न झालं तिचं. तिचे पती शेती करायचे. सगळं आयुष्य मातीतलंच. अचानक काही झालं आणि त्यात मेहुणे वारले. माझी बहीण एकटी पडली. पदरी मुलांचा गोतावळा; पण हिंमत नाही हरली ती. कोपरगावातलं घर बदलून ती इथं शेतात आली. आधी झोपडी बांधली आता दोन खोल्यांचं घर होतं. मुलांची शिक्षणं करायची. राबायला हात नाहीत; पण तिचा संघर्ष चालू होता. तिच्या कष्टाच्या आठवणी मनात दाटत असतानाच आमची गाडी तिच्या वस्तीजवळ पोहोचली होती. ऑफिसची मोठी-थोरली गाडी तिथं बांधाला उभी करून नांगरलेलं रान तुडवत आम्ही तिच्या घराकडे निघालो. ऊन रणरणत होतं. त्यावेळी शेतावर मोठी गाडी येणं हेही वेगळंच होतं. आसपासच्या लोकांचं लक्षही वेधलं जात होतं. आम्ही बहिणीच्या घराजवळ पोहोचलो. तेव्हा ती

ी कोण आलंय? हे उत्सुकतेनं

पाहात होती. तिनं ‘या’ म्हणून आत घेतलं. बसायला एक खाट होती. शेजारी चार-सहा धान्यांची पोती होती. तो काळ भारतातल्या जागतिकीकरणाचा प्रारंभीचा काळ होता. शेती हा दुर्लक्षित भाग होता अन् मनमोहनसिंग यांचा अर्थसंकल्प चर्चेचा, स्वागताचा विषय होता. आम्ही बसलो. पाणी प्यायलो. मी म्हटलं, ‘‘आम्ही जेवणार आहोत.’’ ती काय करायचं याची तयारी करायला लागली. मी आतल्या खोलीत तिच्यासोबत बसलो. प्रारंभीच खुशालीचं बोलणं झालं आणि अचानक चर्चेची गाडी राजकारणावर आली. राज्याच्या, देशाच्या धोरणावर आली. बहीण खेड्यात-वस्तीवर असली तरी तिचं वाचन, सामान्यज्ञान आणि बातम्यांची माहिती चांगली होती. चर्चेच्या ओघात ती पगारदारांवर घसरली. आर्थिक खुलेपणाचं कौतुक करताय; पण इथं पाहिलंय का शेतीत काय चाललंय? प्यायला पाणी नाही. पावसाचा भरवंसा नाही. खतांचे दर वाढलेले, मजूर मिळत नाही. शिक्षणाला तर पैसाचा मोजावा लागतो असं खूप काही ती बोलत होती.

 

 

मी पगारदार म्हणून जरा मागे हटूनच बोलत होतो. बरोबर माझा सहकारी होता. तोही काहीसा बिचकला असावा, घरचे चारघास खावेत म्हणून आलो अन् इथं तर वादळंच उभं ठाकलंय, असं त्यालाही वाटलं असावं. तुमचं ठीक आहे. तुम्हाला महिन्याला पगार मिळतो. फिरायला गाड्या मिळतात. सभा-समारंभामध्ये भाषणं करायला मिळतात; पण पत्रकारांना तरी शेती-शेतकरी यांचा कैवार घ्यावासा वाटतोय का? त्यांना मुळात हिरवीगार शेती पाहायची सवय. दुष्काळ, महागाई, प्रवास हे त्यांना तरी कुठे माहितयं? तुम्ही संघटित, इथं शेतकर्‍यांना कोण संघटित करणार? आमचे इथले नेतेही असेच. एकदा निवडून दिलं, की ते मुंबईत आणि आम्ही इथं वावरात! आता सख्ख्या भावाचा पत्रकार म्हणून उपयोग नाही तो नेत्यांना कशाला दोष द्यायचा? तिचे मन मोकळं करणं सुरूच होतं. आम्ही मुकाटपणे जेवण करीत होतो. मी ग्रामीण भागातला, शेतीतलं मला कळतं. शेतकर्‍यांची दुःखं मलाच माहिती असं मी समजायचो. इतकेच नव्हे, तर पुण्यात माझ्या संस्थेतही मी शेतीतला जाणकार असावा, असा समज होता. आज तो भोपळा फुटत होता. फुटला होता. तिची दुःख, तिच्या यातना, तिचे प्रश्न, समस्या या केवळ तिच्याच राहिल्या नव्हत्या. त्या शेतकर्‍यांच्या म्हणून माझ्यावर आदळत होत्या. मी शहरी, नागरी आणि नोकरदारांचा प्रतिनिधी म्हणून तिचे ते हल्ले सहन करीत होतो.

 

 

आमची जेवणं झाली. आम्ही निघालो. निरोप द्यायला ती गाडीपर्यंत आली. गाडीत बसताना मला उगाचच अपराध्यासारखं वाटत होतं. आमच्या परतीच्या प्रवासात फारशी चर्चा, गप्पा झाल्या नाहीत. कदाचित आम्ही दोघंही अंतर्मुख झालेलो असू. आपणही शेती करावी, असं माझं एक स्वप्न होतं; पण ते वास्तवात आलं नाही; पण आज ती शेतकरी आणि मी नोकरदार अशी विभागणी झाली होती. पाठची भावंडं आम्ही; पण हे अंतर निर्माण झालं होतं. आता माझ्या बहिणीची शेती चांगली आहे. मुलं वेगवेगळ्या पद्धतीनं शेतीतले प्रयोग करीत आहेत. कलिगडाचे भारे गाडीवर लादून कोपरगावच्या बाजारात विकताना मी भाच्यांना पाहिलं होतं. आता बाजार त्यांच्यापर्यंत पोहोचतो आहे. परवाच तिचा फोन आला. म्हणाली, ‘‘यावेळी आंब्याला खूप मोहोर आहे. आंबे खायला ये.’’ मी कदाचित जाईनही; पण जेव्हा जेव्हा शेतकर्‍यांच्या प्रश्नाविषयी ऐकतो, वाचतो तेव्हा मला माझ्या बहिणीची आठवण होते. एक शेतकरी आणि एक पांढरपेशा नोकरदार यांची भेट आठवते. आमच्या नात्यात त्यानं निर्माण केलंलं अंतर आठवतं आणि पुन्हा एकदा शेतीविषयक काही लिहिताना शब्द आक्रमक होतात. हे वाढलेलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरू होतो; खरंच हे अंतर कमी होईल? कधी?

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..