नवीन लेखन...

पावनखिंडीतला ढाण्या वाघ ( १२-१३ जुलै १६६०)

  शाहीर  पहिला  

 पन्हाळ्याहुनी  शिवबाराजे पळत विशाळगडीं

अंधारातुन सोबत करती मर्द मावळेगडी  ।

 

दुश्मनास चकवून धावती चिखलातुन पायीं

सुखरुप राजांना न्यायाची या वाघांना घाई  ।

 

पहाट होतां दिसे पायथा, मागुन दुश्मन धावे

आतां कैसे पुढला वेढा फोडुन वरती जावें ?

 

बोलत बाजी, ‘थांबूं आम्ही, खिंडिस लढवत राहूं

निजदेहांचे बांध बनवुनी झुंडी अडवत राहूं  ।

 

‘लाखांचे पोशिंदे तुम्ही, खुशाल जावें पुढती

अडवूं-तुडवूं आम्ही दुश्मन, मरणाची ना भीती’  ।

 

अखेर पुढती गेले राजे विशाळगड गाठाया

पाय रोवुनी तटले बाजी , शत्रूला रोखाया ।

*

बाजी प्रभू देशपांडे – ( मावळ्यांना)  –

जबरी दुश्मन, मुठभर आपण, परंतु निधडी छाती

तुफान रोखूं, ठाकूं बनुनी सह्यकड्यांच्या भिंती  ।।

 

निबिड अरण्यामधल्या खिंडित अरुंद छोटी वाट

आली कितिही तल्वारींची लाटेवरती लाट

सहज थोपवूं इथें अरीच्या महापुराची शक्ती  ।।

 

वेगें दौडत, विशाळगड नृप अपुला गाठूं पाहे

अपुल्या निष्ठेची शौर्याची आज परीक्षा आहे

स्वराज्ययज्ञीं शोणित शिंपुन देऊं प्राणाहुती  ।।

 

‘दीन दीन’चा निनादतो स्वर, ‘हर हर’ आपण गर्जू

शत्रूच्या समशेरींपुढती खड्ग आपुलें परजूं

तल्वारींच्या खणाखणीनें करूं मृत्यु-आरती  ।।

 

अतुलनीय शौर्य धैर्य अपुलें, मरणाचें भय कैचें ?

वेगें विचरूं, जैसे तांडवनृत्य महादेवाचें

अशक्य बनवूं दुश्मनास पाऊल टाकणें पुढती  ।।

 

घटी-प्रहर-पळ अचल, अचंबित काळ थांबु दे आज

तोफांचे ध्वनि येईतों स्पर्शणार ना यमराज

तोंवर अरिवर अखंड बरसूं लवलवणारी पाती  ।।

*

शाहीर पहिला  –

 झाल्या जखमा प्राणांतिक, पण नाहीं हटले बाजी

लढत राहिले निजप्राणांची लावुन अंतिम बाजी

स्पर्श कराया त्यांना, मृत्यूचीही शामत नव्हती  ।

 

अखेर  आले  गडावरूनी  तोफांचे  आवाज

म्हणती बाजी, ‘अंतिम मुजरा स्वीकारा महाराज

मराठदेशा, ठेव जागती अविरत स्वराज्य-ज्योती’  ।

*

शाहीर दुसरा  –

 ऐसे लढले बाजी, ऐसे शूर मावळे लढले

मर्दुमकीची शर्थ करूनी धारातीर्थीं पडले

स्वराज्य राखाया स्वीकरली खुशिनें वीरगती  ।

 

धन्य स्वराज्याचे पाइक ते, धन्य धन्य रणगाजी

धन्य धन्य ती घोडखिंड, अन् धन्य बहादुर बाजी

धन्य मृत्यु ते, पावन ध्येया संजीवन जे देती  ।

तुफान रोखत बनुन ठाकले सह्यकड्यांच्या भिंती ।

 

— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..