नवीन लेखन...

पद्य आणि मृत्युविचार : भाग ८-ब / ११

[ मराठी काव्य : (पुढे चालू) ]

ऐतिहासिक कवितांमध्ये तर अनेकदा मरणाचे उल्लेख असतातच  –

शिवरायाचा सिंह सिहगडिं पडला समरांगणीं

मराठा गडी यशाचा धनी   ।।

–     कुंजविहारी

खबरदार जर टांच मारुनी जाल पुढे, चिंधड्या

उडविन राईराईएवढ्या  ।।

स्वातंत्र्य-युद्धाच्या संदर्भातील पद्यातही  मरणाचे उल्लेख विपुल असतात . भा. रा. तांबे च्या,‘झाशीवाली’ कवितेतील ‘ती पराक्रमाची ज्योत मावळे इथें झाशीवाली’ या ओळीचा उल्लेख आधीं आलेलाच आहे. आणखी कांहींचें काव्य पहा –

 

भेटेन नऊ महिन्यांनी   ।

आणि हें रामप्रसाद बिस्मिल या स्वतंत्र्यसेनानीचें ( उर्दू ) –

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है

देखना है, ज़ोर कितना बाज़ू ए क़ातिल में है ।

आणि, त्याच संदर्भात हें हिंदी सिनेगीत पहा  –

वतन की राह पे वतन के नौजवाँ शहीद हों ।

मृत्यूची दोन रूपें पहा खालच्या दोन पद्यांमध्ये .  हा लढाईतील मृत्यू   –

हा कोण इथें पडलेला

गोकलखाँ लढनेवाला  ।

( गोकलखाँ – सरदार बापू गोखले )

 

‘केशवकुमार’ (आचार्य अत्रे) यांनी, यावर विडंबनकाव्य लिहून , मरणोल्लेख असा केला आहे –

हा कोण इथें पडलेला

कादरखाँ काबुलवाला  ।

 

आपल्या हें ध्यानात येतें की, प्राणांची बाजी लावून लढणारे सेनापति बापू गोखले असोत , किंवा किसमिस विकणारा कादरखाँ पठाण असो, त्यांचे मरण हें सारखेंच (same) असतें. त्यावरून, समर्थ रामदासांचें दासबोधातील मृत्यूविषयींचें निरूपण आठवतें . (रामदासांचें एक अवतरण आधी दिलेलेंच आहे).

रेव्हरंड  ना.वा. टिळक यांच्या ‘केवढें हें क्रौर्य’ या कवितेतील, एका पक्षिणीच्या मृत्यूचें हें वर्णन पहा . पहिल्या पंक्तीपासूनच ही कविता मरणासन्न पक्षिणीच्या स्थितीचें व मनस्थितीचें, आणि तिच्या impending मरणाचें, हृदयाला भिडणारें वर्णन करते. हें पहिलें कडवें पहा –

क्षणोक्षणीं पडे, उठे परि बळें, उडे बापडी

चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झांपडी

किती घळघळा गळे रुधिर लोमलांगातुनी

तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी .

 

तिच्या मृत्यूचें वर्णन करणारे हें अंतिम कडवें पहा –

मातीत ते पसरले अतिरम्य पंख

केलें वरी उदर पांडुर निष्कलंक

चंचू तशीच उघडी, पद लांबवीले

निष्प्राण देह पडला, श्रमही निमाले .

 

ही कविता वाचून, आदिकवी वाल्मीकीच्या ‘मा निषाद..’ या काव्यमय उद्गारांची आठवण होते. मात्र, वाल्मीकीच्या काव्याचा संबंध मैथुनात-मग्न पक्षिणीच्या मृत्यूशी आहे ; तर कविवर्य टिळक , घायाळ अवस्थेतही आपल्या लहानलहान पिल्लांची काळजी करणार्‍या माता-पक्षिणीचें वर्णन करतात. ही कविता एखाद्या पक्षिणीच्याच काय, पण कुठल्याही मातेच्या मृत्यूला लागू पडते.

नामदेव ढसाळ , अनिल कांबळे, प्रकाश खरात वगैरेंच्या खालील काव्यांमध्ये मृत्यूविचारामधील ‘सामाजिक अंग’ स्पष्ट दिसतें.

ढसाळ यांचे कांहीं काव्यांश पहा :

– या निर्लेप जंगलात मला कधी आठवत नाहीं

त्यानें केलेली हाराकिरी.

– बेघर पोरांचे पाय कबरस्तानामधे दिसताहेत

…..

गुडघे टेकून रडू कबरीकबरीवर ..

– मग सांगा पाण्यावाचून तडफडून मरणार्‍यांनी

काय बदलावं

ढसाळांच्या एका  काव्यांशाचें इंग्रजी भाषांतर  :

While we are being slaughtered

not even a sigh for us

escapes their generous hands.

अनिल कांबळे यांचा एक शेर पहा –

खोकतांना बाप मेला, माय आजारात गेली

घेउनी देहास अपुल्या, लेक बाजारात गेली .

हल्लीहल्लीच, नोव्हेंबर २०१६ मध्ये, प्रकाशित झालेल्या प्रकाश खरात यांच्या ‘जन्ममरण वर्दळीवर येतांना’ या काव्यसंग्रहातील एक काव्यांश पहा –

एक महामानवानं

जन्माला घातलेल्या सूर्यावर

फितूर मारेकरी घालतायत् तलवारींचे घाव …

शिरीष पै यांचे हे दोन हायकू पहा –

मृत्यूनंतर चितेवरती

हें शरीर जळत राहील

त्याला चटके थोडेंच लागतील ?

 

खालील हायकूत एक वेगळीच भावना शिरीष पै दाखवून जातात –

विषारी ओषध मारलें

झुरळ तडफडून मेलें

समाधान वाटलें .

*

(पुढे चालू) ……

— सुभाष स. नाईक    
Subhash S. Naik

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..