नवीन लेखन...

इस्राएल आणि भारत – एक तुलना

इस्राएल आणि भारत – एक तुलना !!!
खूप कमनशीबी आहोत आपण…

खूपच कमनशीबी आहोत…
कारण आपल्याकडे निसर्गाची कृपा आहे,

खूप कमनशीबी आहोत आपण…
कारण आपल्याकडे मोठी युवा शक्ती आहे,

खूप कमनशीबी आहोत आपण…
कारण आपल्याला देश उभारणीसाठी काहीच करावे लागत नाही.

खूप कमनशीबी आहोत आपण…
आपला देश तोफेच्या तोंडावर वसलेला नाही… नव्हे टाचणी टोचली तरी आपल्या डोळ्यात पाणी येते!
आणि…..
खूप भाग्यवान आहेत ते इस्राएली लोक

….खूपच भाग्यवान आहेत कारण……
निसर्गाने त्यांच्यावर कृपेचा कटाक्षही टाकलेला नाही,

खूप भाग्यवान आहेत ते इस्राएली लोक…
कारण त्यांच्याकडे माणसेच नाहीत,

खूप भाग्यवान आहेत ते इस्राएली लोक…
आजही आबालवृद्धाना देशउभारणीसाठी झटावे लागते,

खूप भाग्यवान आहेत ते इस्राएली लोक…

त्यांचा देश दिवसरात्र तोफेच्या तोंडावर वसला आहे, नव्हे सत्तर हजार ज्यू गॅसचेंबर मध्ये कोंबून ठार मारल्याचा इतिहास असल्याने त्यांचे अश्रू आटून गेलेत…!!!
नेमका हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात!
एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने मला जाणवलेले मोठे फरक… ते यासाठी भाग्यवान आहेत की चहुबाजूच्या नशिबाने त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे त्यांचे नशीब त्यांनी स्वतः निर्माण केले आहे. आणि आपण इतके कमनशीबी आहोत की आपल्या सध्याच्या पिढीला सर्वकाही आयते मिळालेले असल्याने स्वतःला काहीच करावे लागत नाही.

आपण इतके कमनशीबी आहोत की आपल्याला देशप्रेम शिकवावे लागते आणि इस्राएली माणसे इतकी भाग्यवान आहेत की ज्यांच्या शरीरात जणू रक्ताऐवजी देशप्रेम असते. !

आपल्यातला आणि त्यांच्यातला वेगळेपणा मला मुंबई विमानतळावरूनच अनुभवायला मिळाला. जगातल्या प्रत्येक विमानतळावर अल् एल् इस्राएल एअरलाईन्सचा सवतासुभा असतो. व्हिसा आणि तिकीट काढून रीतसर निघालेला दुसऱ्या देशातील प्रवासी हा इतर देशांसाठी राजासारखा असतो. पण इस्राएलसाठी प्रत्येक परदेशी प्रवासी मात्र संशयित असतो. विमानाच्या वेळेच्या चार तास अगोदर पोहोचावे लागते. इस्राएली पासपोर्ट असणारे पटकन चेक-इन करून आत जातात पण परदेशी पासपोर्ट असणाऱ्या प्रत्येकाकडे इस्राएली गुप्तहेरसंस्था मोसाद चे काळ्या सुटातले अधिकारी अत्यंत बारकाईने निरखू लागतात.

प्रत्येकाची स्वतंत्र मुलाखत घेतली जाते. त्यांचा पहिला प्रश्न असतो, तुम्ही इस्राएलला का चाललाय? त्या प्रश्नाचे समर्पक उत्तर दिल्यावर बाकी प्रश्न तोफेसारखे धडाडू लागतात. ह्या बॅगा कोणी भरल्या? कधी भरल्या? त्यात टोकदार किंवा स्फोट होऊ शकेल असे काही आहे का? बॅगा भरून झाल्यावर कुठे ठेवल्या? त्यात कोणी बॉम्ब तर ठेवला नाही ना? विमानतळावर येताना कोणी पार्सल दिले काय? सिग्नल ला गाडी थांबल्यावर कोणी बॉम्ब तर ठेवला नाही ना? वगैरे, वगैरे…

असंख्य प्रश्न… उत्तर देताना जर थोडे जरी गडबडलो तरी सर्व बॅगा जमिनीवर उपड्या करून बॉम्ब विरोधी पथकाकडून तपासणी होते.

माझ्या सर्व सामानाची अशीच तपासणी झाली. पण कर नाही त्याला डर कशाला? तरीही ते लोक अशा पद्धतीने काही विशिष्ट प्रवाशांची तपासणी करत होते की जसे काही आम्ही अतिरेकीच आहोत! जे ज्यू धर्मीय नाहीत त्या प्रत्येकाकडे संशयाने बघणे हा जणू त्यांच्या कामाचाच एक भाग होता. माझ्या पासपोर्टला एका स्त्री अधिकाऱ्याने एक स्टिकर चिकटवले. याचा अर्थ मला नंतर कळला की या व्यक्तीच्या सामानाची पूर्ण झडती घ्यावी.

माझ्याकडच्या प्रत्येक वस्तूवरून त्यांनी बॉम्बविरोधी यंत्र फिरवले. पूर्ण खात्री पडल्यावरच त्या स्टिकरवर हिरवे स्टिकर चिकटवून जाऊ दिले. तेलअलिव्ह येथे उतरल्यावर इतर दोन बॅगांवरसुद्धा हिरवे स्टिकर दिसले. याचा अर्थ त्या बॅगाही संपूर्ण तपासल्या होत्या. अहो, सदैव मृत्यूच्या हातात हात घालून चालणारी माणसे ही…..

ज्या परिस्थितीत ते लोक जगतात त्या परिस्थितीत ते दुसऱ्यावर विश्वास ठेवूच शकत नाहीत. त्यांचा विश्वास फक्त स्वतःच्या मृत्यूवर असतो, बाकी कशावरच नाही, अगदी जीवनावरही नाही!

रोजचे जगणे हीच इस्राएली लोकांची परीक्षा असते. केवळ एकवीस हजार किलोमीटर चे क्षेत्रफळ लाभलेला हा देश वेढलेला आहे जॉर्डन, इजिप्त, लेबेनॉन, गाझा आणि सीरिया या सदैव अशांत देशानी. कोठून कसा मिसाईल हल्ला होईल ते सांगता येत नाही. प्रत्येक इमारतीखाली जमिनीत एक बंकर असते. जर बॉम्बहल्ला सुरू झाला तर भोंगा वाजू लागतो. केवळ पाचच मिनिटात सर्वजण त्या बंकरमध्ये जमतात. तेथे ऑक्सिजन च्या सिलेंडर आणि मास्कपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्व अत्यावश्यक सोयी केलेल्या असतात. वरची संपूर्ण इमारत जरी कोसळली तरी ते बंकर त्यांना जिवंत ठेवते.

“कधी या बंकरचा वापर करावा लागला का हो?” मी आपला भाबडा प्रश्न विचारला. कारण बॉम्बहल्ला फक्त आपण चित्रपटातच पाहिलेला असतो.

“अनेकदा अनुभवलाय… सध्याच जरा शांतता आहे. कारण आम्ही आमच्या सर्व सीमेवर भिंत बांधलेली आहे. आणि ठिकठिकाणी रडार आणि मिसाईल विरोधी यंत्रणा बसवलेली आहे. जर एखादे मिसाईल आलेच तर ते हवेतच नष्ट केले जाते.” ज्यांच्याकडे माझी मुक्कामाची सोय होती ते सायमन पेणकर मला सांगत होते. त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य काळजाला घरे पाडत होता…

“तुम्हाला जगताना भीती वाटत नाही का हो?” हा प्रश्न विचारताना माझ्याच पोटात भीतीचा गोळा आला होता.

ते हसले आणि म्हणाले, “आम्ही भीतीवर मात केली आहे. मृत्यूच्या हातात हात घालूनच आम्ही चालतो, मग भीती कसली? प्रत्येक इस्राएली नागरिकाला किमान दोन वर्षे सैनिकी शिक्षण घ्यावेच लागते. अठराव्या वर्षानंतर पुरुषाला तीन वर्षे आणि स्त्रीला दोन वर्षे अतिशय कडक शिस्तीत सीमेवर लढावे लागते. मग भीतीच पळून जाते.

_”आमच्याकडे कुटुंबनियोजन आहे पण ते उलटे आहे.” पेणकरांनी माझ्यावर गुगली टाकला.

“म्हणजे? मी समजलो नाही.” अनभिज्ञतेने मी विचारले.

“सरकार जास्तीतजास्त मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देते. दोन मुलांनंतर सरकार आम्हाला प्रत्येक अपत्यासाठी आर्थिक मदत करते.”

“का बरे? लोकसंख्या कमी आहे म्हणून?”

“नाही, असलेल्या मुलांपैकी दोन तीन मुले युद्धात मरू शकतात म्हणून! बावीस वर्षानंतर आम्हाला झालेली एकूलती एक मुलगी आहे पण तीसुद्धा पुढच्या वर्षी सैन्यात जाईल. तिला सुटका नाही.”

बापरे…!!! त्यांचे ते शब्द ऐकून मी नखशिखान्त हादरलो. आपल्या महाराष्ट्रात, सातारा जिल्ह्यात घरटी एकजण सैन्यात असलेले अपशींगे हे गाव आहे. त्या गावाचा आपल्याला किती अभिमान आहे! इथे तर प्रत्येक घरातला प्रत्येक जणच सैन्यात आहे, त्यांना किती देशाभिमान असेल? त्यामुळे एकमात्र होते की सैन्याबाबत अश्लाघ्य उद्गार काढणारे नेते किंवा अभिनेते तिथे नाहीत, ते फक्त आपल्या भारतातच असतात. सैनिक सीमेवर जागता पहारा देतात म्हणून आपण सुखाने घरात झोपू शकतो हे आपल्याला मुद्दाम सांगावे लागते, मात्र इस्राएली लोक ते स्वतः अनुभवतात. स्वतःच्या सुरक्षेची किती काळजी त्यांनी करावी?

या देशाची अल्-एल इस्राएल ही एकमेव विमानकंपनी आहे. तिच्या प्रत्येक विमानात मिसाईल विरोधी यंत्रणा आणि मिसाईल बसवलेले असतात. कुठेही दगाफटका झालाच तर ते प्रवासी विमान फायटर विमानात बदलते. अशी यंत्रणा जगातल्या कोणत्याही देशाकडे नाही.

मोसाद ही जगातली सर्वात हुशार गुप्तहेर संघटना या देशाकडे आहे. त्यांना तर शत्रूच्या मनात काय चालू आहे हेसुद्धा ओळखता येत असावे. त्यामुळे चहूबाजूनी शत्रूने घेरूनसुद्धा हा देश कणखरपणे उभा आहे. अमेरिकेवर अतिरेकी हल्ला होऊ शकतो पण आजवर इस्राएलवर हल्ला करण्याची हिंमत कोणत्याही अतिरेकी संघटनेला झाली नाही. कारण त्यांना माहीत आहे की या देशाची जराजरी आगळीक केली तर हे लोक आपले अस्तित्वच संपवून टाकतील !

म्युनिच ऑलिम्पिक मध्ये अतिरेक्यांनी इस्राएली खेळाडूंना अपहरण करून ठार मारले. या घटनेनंतर पंतप्रधान गोल्डा मायर यांनी शाब्दिक निषेध व्यक्त केला नाही किंवा घटनेची निंदाही केली नाही. त्यांनी प्रत्येक खेळाडूच्या घरी स्वतः फोन करून एवढेच सांगितले की आपण नक्की बदला घेणार!

आणि खरोखरच जे अतिरेकी या घटनेत सामील होते त्यांना मोसादने शोधून काढून ठार मारले.

आणि आपल्याकडे? मुंबई बॉम्बस्फोटापासून ते सैनिकांचे शीर कापण्यापासूनच्या घटनांचा तीव्र शब्दात धिक्कार केला गेला. शिवाय त्या अतिरेक्याला फाशीपासून वाचवण्यासाठी आपल्या देशातीलच मानवतावादी (!) मध्यरात्रीही कामाला लागले होते! देशभक्ती ही बाहेरून आत टाकायची किंवा शिकवायची गोष्टच नाहीये. ती आतून यावी लागते!

हा देश पाहिल्यावर लक्षात येते की एकीकडे क्षणाक्षणाला मृत्यू अनुभवणारे लोक या जगात आहेत तर दुसरीकडे कशाचेच सोयरसुतक नसणारे आणि बेफिकीर असणारे आपण भारतीय आहोत.

कोणत्याही प्रकारची अनुकूलता नसणारा हा देश सर्व बाजूनी प्रगती करतोय आणि आपल्याला नैसर्गिक साधनसमुग्रीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व प्रकारची अनुकूलता सहज उपलब्ध आहे. तरीही आपण काहीही मिळत नाही म्हणून रडतोय.

इस्राएली लोक भाग्यवान आहेत की त्याना आयते काहीच मिळालेले नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांना झगडूनच मिळवता आली आहे. म्हणून त्याचा त्याना आनंद घेता येतोय. आणि आपण असे कमनशिबी आहोत की सर्व गोष्टी सहज साध्य मिळाल्यामुळे त्या मिळवण्याचा आनंद घेता येत नाही.

खूप खूप शिकण्यासारखे आहे आपल्याला त्यांच्याकडून…..

…खूपच!

— अभय शरद देवरे, सातारा

 

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..