नवीन लेखन...

इंद्रिये अवयव आणि आहार – भाग एक

आपल्या पचनाचा प्रत्येक इंद्रियांशी संबंध असतो. पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये आणि मन यांचा पचनाशी कसा संबंध असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

या सगळ्यांमधे महत्त्वाचे आहे, मन ! मनामार्फत अनुभूती येत असते. जर हे मनच जागेवर नसेल, तर आपण काय खातोय, त्याची चव कशी असणार, हे अनुभवले नाही, तर त्याचा होणारा परिणाम वेगवेगळा होणार.

जेवताना, खाताना टीव्ही बंद असावा, असे जेव्हा वारंवार आई ओरडते, तेव्हा नेमके काय बदल होतात, जे पचन बिघडवतात ? हे समजून घेतले तर जेवताना लक्ष जेवणातच राहील. जसे शिकवताना लक्ष शिक्षकांकडे असेल तरच शिकवलेले डोक्यात जाते, नाहीतर इकडून तिकडे शब्द धावत सुटतात. त्याचा अर्थ मनामार्फत इंद्रियापर्यंत पोचतच नाही.

रसग्रहण नावाचा शब्द साहित्य क्षेत्रात वापरला जातो. तो मुळात आहारशास्त्रातील आहे. गोड, आंबट, खारट, तिखट,कडू आणि तुरट या सहा रसांचे ग्रहण कधी होईल, जर माझे मन जाग्यावर म्हणजे जेवताना, जेवणाच्या ताटावर असेल तर. वेळ मिळेल तसे मी जेवून घेतो, मी डबा खातो, कामात गुंतलो तर लागलेली भूक लक्षात सुद्धा येत नाही, काही वेळा कधी पोट भरलंय, हे पण कळत नाही. अशी अवस्था असणाऱ्यांनी जरा सावध रहायला हवे, कारण यांचे पचन हमखास बिघडते. आणि हीच छोटी छोटी कारणे पुढे काट्याचा नायटा करतात.

जेवणाचा डबा न्यावा लागणं ही गरज आहे, कोणी हौस म्हणून डबा नेत नाही. शाळेची सहल हा या हौसेला अपवाद असायचा. सहलीला न्यायच्या डब्याची गंमत काही औरच असायची….
आता यातून आनंद मिळवत जेवलो तर खाल्लेल्याचं पचन होणार. नाहीतर अगदी प्रेमळ बायकोच्या हातचा, प्रेमानं बनवून दिलेला, डबा जर मनापासून खाल्ला नाही तर पचन पूर्ण होणार नाही.

डबा कसा खाल्ला तर आनंद जास्त मिळेल? विचार करून पहा. काही कारणाने कामावरून, जेवणाच्या वेळीच घरी आलोय, सकाळी भरून दिलेला डबा सोबत आहे, तर तो डबा आपण कसा खाऊ ? तर नेहेमी जेवतो ते ताट समोर घेऊ, डब्यातले जे काही एक दोन जिन्नस असतील, ते ताटात वाढून घेऊन जेवायला सुरवात करू. आणि छान शांतपणे जेवू. डबा तोच आहे. आपणच वाढून घ्यायचा आहे, पण ताटात वाढून घेऊन जेवलो तर मिळणारा आनंद वेगळा असतो.

म्हणजे डब्यातल्या डब्यात जेवणे, आणि ताटात वाढून जेवणे यात फरक आहे. ताटात वाढून जेवण्यात जे समाधान मिळते, ते डब्यातल्या डब्यात बुचकून खाण्यात मिळत नाही.

अर्थात काही भगिनीना, डबा खाणं हे तेवढंच आनंददायी वाटतं.
रोजच्या रांधा वाढा… या चक्रातून सुटका तर मिळते तिला ! उरलं सुरलं काढून ठेवणे नाही, ओटा टेबल पुसायला नको, पुढची आवराआवर करावी लागत नाही….

रोज डबा खाण्याची जागा जरी घर नसली, तरी डब्यातील सर्व पदार्थ ताटात वाढून जेवण्यातला आनंद तर आपण घेऊ शकतो ?

एका ताटाचा तर प्रश्न आहे, तेवढे एक ताट काम करतो तिथे ठेवून द्यायचे की झाले. तेवढेच समाधान !!

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
16.03.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..